आपली मातृभाषा आपण प्रथमतः ऐकतो, नंतर बोलतो आणि त्यानंतर वाचन करण्यास सुरुवात करतो. जसजसे विद्यार्थी पुढच्या इयत्तेत जातात, तसतसे वाचन करण्यास अधिक वेळ देणे क्रमप्राप्त ठरते. मराठी माध्यमामधून शिकणाऱया विद्यार्थ्यांना पाचवीपर्यंत मराठी आणि सातवीपर्यंत इंग्रजी न अडखळता वाचता येणे गरजेचे आहे. मराठी वाचता आले तर हिंदी वाचन सुलभ जाते. इंग्रजी माध्यमामधून शिकणाऱया विद्यार्थ्यांना पाचवीपर्यंत क्रमिक पुस्तकामधील धडा अस्खलितपणे वाचता येणे अपेक्षित आहे. न अडखळता वाचणे याचा अर्थ कोणतेही वाक्मय एकदा वाचल्यानंतर त्याचा अर्थ त्वरित समजणे. अनेक विद्यार्थी/नी बऱयाच वेळेस वाचन करता करता वाक्मय न समजल्यामुळे तेच वाक्य पुनःपुन्हा वाचतात. या सवयीला वेळीच अटकाव घातला नाही तर पुढे याचे गंभीर दुष्परिणाम संभवतात.
पाचवीच्या पुस्तकापेक्षा आठवीची पुस्तके अधिक पानांची असतात, त्यापेक्षा दहावीच्या पुस्तकांच्या पानांची संख्या अधिक असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रत्येक विषयाचे क्रमिक पुस्तक किमान 200 पानांचे असते. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणात प्रत्येक विषयाच्या किमान दोन संदर्भ पुस्तकांचे वाचन होणे अपेक्षित असते. त्यामुळे प्रत्येक पुढील इयत्तेमध्ये वाचन वेग वाढणे ही काळाची गरज असते. पाचवीपासून दहावी बारावी कॉलेजच्या पहिल्या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांचे वाचन कसे आहे याची मी परीक्षा घेतली आणि लक्षात आले की आठवीच्या विद्यार्थ्यांची वाचनाची पातळी पाचवीच्या पातळीपेक्षा कमी आहे. दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजीमध्ये कोणताही परिच्छेद वाचल्यानंतर आपल्याला त्यातले नेमके काय समजले, हे सांगता येत नाही. याला कारणे दोन. पहिले कारण वाचन क्षमता कमी आणि दुसरे कारण म्हणजे जे वाचन केले त्याचा सारांश एक-दोन वाक्मयात सांगणे अनेक विद्यार्थ्यांना कठीण जाते. इंजिनिअरिंग/ मेडिकल/ कॉमर्स/ सायन्सच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱया अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाच्या पुस्तकातील पन्नास पाने एका बैठकीमध्ये सलगपणे वाचता येत नाहीत.
वाचनाचे महत्व जाणूनही शालेय शिक्षक वाचन करण्याचा गृहपाठ देत नाहीत, कारण त्याना अभ्यास केल्याचा पुरावा तपासणे अधिक सोयीचे वाटते, त्यामुळे ‘धडय़ाखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहून आणा’ अशाच स्वरूपाचा गृहपाठ दिला जातो. शिक्षकाना ठराविक अभ्यासक्रम ठराविक काळात संपवणे हे उद्दिष्ट असल्यामुळे विद्यार्थी काय वाचत आहेत, कसे वाचत आहेत, गृहपाठ धडा-कविता वाचून सोडवत आहेत की गाईडमध्ये बघून न समजता लिहित आहेत, हे तपासण्याची इच्छा नसते आणि वेळही नसतो. खरे तर वाचन ही एक कला आहे आणि त्यामध्ये आपण गेल्या वर्षापेक्षा अधिक सफाईदारपणा आणला आहे का? / प्रभुत्व मिळवले आहे का? हे प्रत्येकाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तपासायला हवे.
तर अनेक प्रश्नांचे मूळ असलेले ‘वाचन’ प्रत्येकाने कसे सुधारावे?
1) लहानपणी प्रत्येक शब्दावर बोट ठेवून मोठय़ाने वाचन करण्याची सवय असते, ती पुढील इयत्तेमध्ये गेल्यानंतर सोडणे गरजेचे आहे. सातवी- आठवीमधील विद्यार्थ्यांनी शब्द-वाक्मयावर बोट न ठेवता नजर त्यावर ठेवून वाचन करावे, ते सुद्धा मनातल्या मनात. 2) अनेक शाळांमधील आठवीनववी-दहावीमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांची वाचन क्षमता चाचणी मी घेतली तेव्हा असे लक्षात आले की 60 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह वाचत नाहीत. त्यामुळे आपण काय वाचतो आहोत, ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे पालकांनी चौथी-पाचवीपासून विद्यार्थ्यांना अचानकपणे मोठय़ाने वाचायला लावून ते कसे वाचत आहेत, याची परीक्षा घ्यावी. कोणतेही पुस्तक/वृत्तपत्र/ मासिक वाचताना विरामचिन्हे स-अभिनय वाचल्यास जे वाचन करत आहोत, त्याचा अर्थ पहिल्याच वाचनात समजतो. उदाहरणार्थ- शामूकडं बोट दाखवून दोघं-तिघं तावातावाने म्हणाले, “काय मालक? हे कासव कोठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा.’’ हे वाक्मय मनातल्या मनात वाचताना प्रश्न चिन्ह वाचावे, त्याचप्रमाणे ‘तावातावाने’ विचारल्याचा (संयत) अभिनय वाचताना करावा.
3) प्रत्येक शब्द न वाचता शब्दांचा समूह एका नजरेत साठवून वाचण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. Mary Kom’s career started in 2000 after her victory in the Manipur State Women’s Boxing Championship. हे वाक्य वाचताना Mary Kom’s career started in 2000 असे प्रत्येक शब्दानंतर न थांबता शब्दांचा अर्थाप्रमाणे समूह करून `Mary Kom’s career’ `started in 2000′ `after her victory in the Manipur State Women’s Boxing Championship.’ असे वाचल्यास आपण जे वाचतो त्याचा अर्थ समजण्यास मदत होते आणि वाचनाचा वेग वाढतो.
4) एका तासामध्ये किती पाने वाचून झाली याचे रेकॉर्ड रोजच्या डायरीमध्ये लिहून ठेवावे, जेणेकरून आपले वाचन रोज सुधारत आहे किंवा नाही, याची खातरजमा करता येईल. मी कॉलेजमध्ये असताना अभ्यास करण्यासाठी मित्राबरोबर स्टडी रुममध्ये जायचो, एकमेकांपासून लांब बसायचो आणि ‘आज 3 तासात हे पूर्ण क्रमिक पुस्तक वाचून संपवू’ असे नियोजन करायचो. तीन तासात 150 पाने वाचून झाली किंवा नाही हे आपोआप बघितले जायचे. द्रुत लयीमध्ये वाचन करण्याची त्यामुळे सवय लागली. आजही मी वाचन करताना एक तासानंतर किती पाने झाली हे तपासतो. असे केल्यामुळे एक तासभर वाचनावर लक्ष केंद्रित होते आणि मोबाईलसारख्या इतर व्ययधानात लक्ष विचलित होत नाही.
5) कोणताही धडा पहिल्यांदा वाचताना त्यातला शब्दनशब्द लक्षपूर्वक वाचन करणे (X Ray) अपेक्षित असते. दुसऱया वेळेस तोच धडा वाचताना पुढच्या वाक्यात काय मजकूर असेल हे लक्षात आलेले असते त्यामुळे (skimming) वाचनाचा वेग वाढतो. परीक्षेपूर्वी तिसऱया वेळेस वाचन करताना मोठा शब्दसमूह एकाच नजरेत येतो आणि तिसरी उजळणी कमीत कमी वेळेत पूर्ण होते.
– सुहास किर्लोस्कर