मुंबई / ऑनलाईन टीम
‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची पाठराखण केल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीक केली आहे. वाझेकांड हे सरकार पुरस्कृत हप्तावसुली कांड होते का? असा प्रश्न विचारत या प्रकरणाचे संबध शिवसेनेशी जुळत आहेत का? असेही ट्विट त्यांनी केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
“शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचे सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्ये सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.
सामना संपादकीयमध्ये काय म्हटले आहे..
“मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्याने आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. करोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचे धैर्य ढळू दिले नाही. त्यामुळे पुढे या प्रकरणात सीबीआय आली, तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढे सीबीआयला जाता आले नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या. त्या कांड्यांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.”