मुंबई \ ऑनलाईन टीम
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काल, बुधवारी भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. यानंतर शिवसैनिक आणि आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपने शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या आरोपाला संजय राऊत यांनी शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका असा इशाराच भाजपला दिला आहे. आता संजय राऊत यांच्या इशाऱ्याला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की, शिवभोजन थाळीचं नंतर बघू, अगोदर शिवसैनिक सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची ‘आतमध्ये’ भत्ता मिळण्याची व्यवस्था करा! वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू, तेवढेच पुण्य लागेल!…असा इशारा प्रविण दरेकरांनी दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. एक टोळका आला होता. आता तो कशासाठी आला होता आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. मराठी अस्मितेचं प्रतिक असणारी वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.राम मंदिरासंबंधी काही आरोप केले असं म्हणत असाल तर तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुम्हाला शिक्षणाचा गंध आहे का? सामनात काय लिहिलं आहे ते वाचा. शिवसेनेचे प्रवक्ते काय बोललेत ते ऐकून घ्या. जे आरोप झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका असं अग्रलेखात स्पष्ट म्हटलं आहे. त्याच्यावर एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भाजपावर कुठेही थेट आरोप केलेला नाही. भाजपने घोटाळा केल्याचं कुठेही म्हटलेलं नाही. ट्रस्टमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा मागणं गुन्हा आहे का?, अशी विचारणा संजय राऊतांनी यावेळी केली.
श्रद्धेच्या वास्तू संदर्भात आरोप होत आहे. त्या आरोपावरती लोकांनी खुलासा मागितला तर तो काही गुन्हा आहे का? ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा सेना भवनाच्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादेत राहुद्या. त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू देऊ नका. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.