प्रतिनिधी/ वास्को
वाडे वास्को येथील तळय़ात पुन्हा मृत मासे आढळून आले आहेत. या मृत माशांमुळे त्या परिसरात दुर्गंधीही जाणवू लागल्याने स्थानिक नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. या तळय़ात मासे मृत होण्याचे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने संबंधित सरकारी खात्याने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होऊ लागलेली आहे.
काही वर्षांपूर्वी जवळजवळ चौदा कोटी खर्चून सौदर्यीकरण करण्यात आलेले व वाडे वास्कोतील महामार्गाच्या बाजूला असलेले तळे मागच्या काही वर्षांपासून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सौदर्यीकरणामुळे लोकांची वर्दळ या ठिकाणी वाढलेली आहे. या तळय़ासमोर उच्च माध्यमिक विद्यालयसुद्धा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ या तळय़ाच्या काठावर असते. काही वेळा या ठिकाणी कार्यक्रमही होत असतात. हे तळे सध्या विरंगुळय़ाचे ठिकाण बनलेले आहे. परंतु काही वेळा या तळय़ात मासे मृत होण्याचे प्रकार घडत असून मृत माशांमुळे दुर्गंधीही निर्माण होत असते. वर्षातून किमान एकदा तरी या तळय़ात मृत मासे तरंगताना आढळून येतात. अशा प्रकारानंतर या तळय़ातील प्रदुषणाबाबत चर्चा होते. मात्र, गंभीर दखल कुणी घेत नाही. त्यामुळे ही समस्या कायम राहिलेली आहे. मागच्या दोन दिवसांत या तळय़ात पुन्हा मृत मासे तरंगताना आढळून आल्याने पुन्हा चर्चा झाली. त्या ठिकाणी काही प्रमाणात दुर्गंधीही निर्माण झाली.
अनेक कारणांमुळे तळय़ात प्रदुषण, मत्स्य जीवांवर परिणाम
वाडेतील तळय़ाचे सौदर्यीकरण करण्यात आलेले असले तरी या तळय़ाचे पाणी गलिच्छ असून त्या गलिच्छतेत अधूनमधून भरच पडत असते. अशाच स्थितीत या तळय़ात दरवर्षी भक्तीभावाने श्री गणेश मूर्तींचे विसर्जनही होत असते. परंतु एकाही गणेश भक्ताने या तळय़ाच्या स्वच्छतेची मागणी कधी कुणाकडे केलेली नाही. पूर्वी शेजारील काही इमारतींमधून सांडपाणी या तळय़ात सोडले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आजही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या भुयारी गटारातील सांडपाणीही या तळय़ात झिरपत असल्याचा संशय आजही व्यक्त करण्यात येत आहे. अन्य प्रकारची गलिच्छताही या तळय़ाच्या पाण्यात दिसून येते. गलिच्छतेमुळे या तळय़ात बऱयाच वेळा शेवाळ पसरते. सदर तळे वाडेतील एका पारंपरिक नाल्याव्दारे समुद्राला जोडलेले आहे. त्यामुळे भरती व ओहोटी वेळी या तळय़ाचे पाणी खेळते राहात होते. त्यामुळेच या तळय़ाच माशांची पैदास फार पूर्वीपासून होत आहे. तेथे जाळ टाकून मासेमारी केली जायची. परंतु आता तळय़ाला समुद्राला जोडणाऱया त्या नाल्याच्या आड अनेक समस्या आलेल्या आहेत. तो नाला नाममात्रच राहिलेला आहे. ही या तळय़ाचे प्रमुख अडचण आहे. या समस्येकडे कुणी फारशा गांभिर्याने पाहिलेले नाही. अशा अनेक कारणांमुळे वाडेतील तळे ज्याला पूर्वीपासून आगर म्हणून ओळखतात, ते प्रदुषीतच राहिलेले आहे.
संबंधीत सरकारी खात्याने तळय़ातील प्रदुषणाची दखल घेण्याची मागणी
या तळय़ात माशांना अपायकारक असणारे द्रव्य किंवा पदार्थ सोडले जात असल्याने तळय़ातील मासे मृत होत असावेत असा संशय आहे. या प्रदुषणाबरोबरच या तळय़ाचा समुद्राकडे असलेला संपर्क पूर्वीसारखा राहिलेला नसल्याने पाणी खेळते राहात नाही. त्यामुळे माशांवर परीणाम होतो. तसेच हे प्रदुषीत पाणी गरमीच्या दिवसांत उन्हामुळे तापते. त्याचाही परीणाम मस्त्यजीवांवर होतो व ते मृत होतात असाही संशय काही जण व्यक्त करीत आहेत. संबंधीत सरकारी खात्यानी या पर्यावरणाला हानीकारक असलेल्या घटनांची त्वरीत दखल घ्यावी व तळय़ातील प्रदुषण दूर करण्यासाठी योग्य पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.