प्रतिनिधी/ सातारा
जावली तालुक्यातील अति दुर्गम व डोंगराळ भागातील वाडय़ावस्त्यांवर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होत असते या वाडय़ावस्त्यांवरील ग्रामस्थांना तातडीने पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त वाडय़ावस्त्यांवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने टँकर सुरु करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
जावली तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन उपाय योजना करण्यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा व निवारण समितीची बैठकीत झाली. या बठकीस तहसीलदार शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सौ. अर्चना रांजणे, पंचायत समिती सभापती सौ.जयश्री गिरी, सदस्य सौ.अरुणा शिर्के, विजयकुमार सुतार, ज्ञानदेव रांजणे, उपअभियंता डी. व्ही.पाटील , शगटविकास अधिकारी सतीश बुद्धे, नायब तहसीलदार सुनील मुनावळे, तपासे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.
पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीत तालुक्यामध्ये 39 गावे व 26 वाडय़ांमध्ये पाणी टंचाई घोषित झाली असून त्यावर उपाय योजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. 5 गावांना सेवा भावी संस्थांमार्फत पाणी पूरवठा सुरू असून 5 गावांना शासकीय टँकर सुरू करणेबाबत नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. तेटली,मोरावळे व खामकरवाडी येथील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. टंचाई उपाय योजना अंतर्गत सांगवी तर्फ मेढा , रेंगडी , मुकवली ,गांजे पाटणेमाची या नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामांना जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून मंजुरी मिळाली आहे. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई भासत असेल त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केल्यास सत्वर टँकर मंजुरी बाबत कार्यवाही करावी अशा सुचना आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. बामणोली दंडवस्ती व कुसूंबी गावचे वरील मुयावर पाणीटंचाई असलेबाबत सदस्यांनी सांगितले तसेच तालुक्यात ईतर ठिकाणी पाणीटंचाई असल्यास सत्वर उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना केली. याबाबत गटविकास अधिकारी यांनी टंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.
कोणतीही वाडी वस्ती टंचाईग्रस्त राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. विविध गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाने आराखडा, प्रस्ताव तयार करावा. पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ.त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने टंचाई निवारणाचे काम करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.