विमान प्रवाशांची संख्या घटली : आरटीपीसीआर चाचणीची सक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात झपाटय़ाने होत असून बेळगाव विमानतळालाही याचा फटका बसला आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे अशा राज्यांमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. यामुळे बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कमी प्रवासी संख्येचा फटका विमान कंपन्यांनाही बसू लागला आहे.
उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून बेळगाव विमानतळाची ओळख आहे. दररोज 1500 च्या आसपास प्रवासी विमान प्रवास करीत असतात. मुंबई, बेंगळूर, तिरुपती, कडप्पा, म्हैसूर, हैदराबाद, अजमेर, सूरत, अहमदाबाद, नाशिक या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील प्रवासी संख्येत बेळगाव विमानतळ तिसऱया स्थानी आहे. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बेळगाव विमानतळावर सर्व आवश्यक सेवा पुरविल्या जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा महानगरांमध्ये वाढू लागल्याने याचा फटका विमान प्रवासाला बसत आहे. मुंबई, बेंगळूर या शहरांच्या प्रवासीसंख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. याच सोबत प्रवाशांनी कोरोनामुळे प्रवास टाळल्यामुळे इतर शहरांनाही अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच सध्या दररोज 900 ते 1000 प्रवासी विमानतळावरून प्रवास करीत आहेत. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे याचा फटका विमान कंपन्यांना बसू लागला आहे.
बेळगाव विमानतळावर खबरदारी
ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे त्या राज्यांमधून बेळगावमध्ये येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. यामुळेही काही प्रवाशांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.