भारतीय शास्त्रज्ञाचे महत्वपूर्ण संशोधन
पुणे / वृत्तसंस्था
वाढते तापमान आणि कोरोना विषाणूची घटती शक्ती यांचा परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. सखोल संशोधनातून हा महत्वपूर्ण आणि दिलासादायक निष्कर्ष राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संस्थेने काढला आहे. हे संशोधन भारतातील अनेक शहरांमध्ये, तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये करण्यात आले. संस्थेचे शास्त्रज्ञ हेमंत भेरवानी यांनी ही माहिती दिली.
तपमान आणि आर्द्रता ज्या प्रमाणात वाढते, त्या प्रमाणात कोरोना विषाणूची शक्ती घटत जाते. त्यामुळे उष्ण आणि दमट हवामानात हा विषाणू निष्प्रभ ठरतो, असे या संशोधनातून दिसून आले आहे. एका गणिती प्रारूपाची निर्मिती करून हे संशोधन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल पर्यावरण विभागाला देण्यात आला.
भारतात बहुतेक स्थानी उष्ण आणि दमट हवामान असते. विशेषतः उन्हाळय़ात भारताच्या 90 टक्के भूभागात तापमान 38 अंशाच्या वर असते. समुद्रतट भागांमध्ये तापमानाबरोबरच आर्द्रताही मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा योग्य कालावधी आहे, असा या संशोधनाचा अर्थ आहे. तथापि, केवळ याच एका निष्कर्षावर अवलंबून राहण्याचा संस्थेचा विचार नाही. इतर मुद्दय़ांवरही संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शारिरीक अंतर हा सर्वोत्तम उपाय
या संस्थेच्या संशोधकांनी इशारा दिला आहे की, केवळ तापमान वाढले म्हणजे हा विषाणू अपोआप नाहीसा होईल असे कोणी मानू नये. आपण आपल्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरूच ठेवायला हवे आहेत. शारिरीक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे आणि मुखावरण (मास्क) व इतर सुरक्षा साधनांचा उपयोग यापुढेही कित्येक महिने करावाच लागणार आहे. याशिवाय सतत हात निर्जंतुक ठेवणे आणि शारिरीक स्वच्छता पाळणे अनिवार्य आहे, असेही स्पष्ट केले गेले.