कोरोना चाचण्या वाढल्या म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे, हे तार्किक मुद्यावर पटत असले तरी रुग्णसंख्या वाढत असल्याची बाब कोव्हीड युद्धात त्रुटी आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत आहे. त्रुटी असल्यास त्या शोधून त्वरित सुधारणे आवश्यक आहे.
गेल्या आठवडय़ापासून राज्य आणि मुंबईतील दैनंदिन कोरोना नोंद सतत वाढत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना नोंदीने 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत तर रोज ही संख्या 1200 ते 1500 च्या उंबरठय़ावर असते. ही चिंतेची बाब आहे. मुंबईतील पहिला कोरोना रुग्ण आढळून आता सहा महिने उलटून गेले. सुरुवातीच्या दिवसात कोरोनाची ओळखच नसल्याने त्यासोबतचा लढा कसा लढायचा याबाबत आपण सर्वच अनभिज्ञ होतो. मात्र आता सहा महिन्यांनी जर त्याच सुरुवातीच्या महिन्यांमधील चुका होत असतील तर रुग्णसंख्या वाढणे साहजिकच आहे. गेल्या आठवडाभरातील मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येवर नजर फिरवल्यास अनलॉक होताना घराबाहेर पडावे की पडू नये अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. या भीतीमुळेच गेले तीन महिने प्रतिबंधासाठी पालन केलेले नियम वाया गेल्यासारखे वाटत आहेत. आजही कोरोनाबाबत तितकेच अज्ञानी राहावे हेच मुळात पटत नाही. 30 ऑगस्टपासूनच्या कोरोना आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वसामान्यांच्या मनातील भीती रास्त ही वाटते. मुंबईत 6 सप्टेंबर रोजी 1910, 5 सप्टेंबर 1735, 4 सप्टेंबर 1929, 3 सप्टेंबर 1526, 2 सप्टेंबर 1622, तर 1 सप्टेंबर 1142, 31 ऑगस्ट 1179 तसेच 30 ऑगस्ट 1237 एवढी होती. सप्टेंबरपासून आकडेवारीत भयंकर वाढ झालेली दिसते. राज्यातील कोरोना आकडेवारीसुद्धा तोंडाला फेस आणणारी आहे. 6 सप्टेंबर रोजी 23,350, 5 सप्टेंबर 20,489, 4 सप्टेंबर 19,218, 3 सप्टेंबर 18,105, 2 सप्टेंबर 17,433 तर 1 सप्टेंबर रोजी 15,765 एवढी नोंद आहे.
ऍक्टिव्ह रुग्णांची आकडेवारीही लक्षणीय आहे. सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी 1,98, 523 ऍक्टिव्ह रुग्ण होते. 2 सप्टेंबर 2,01,703, 4 सप्टेंबर 2,10,661, 5 सप्टेंबर 2,20,661 वर संख्या पोहोचली होती. ऍक्टिव्ह रुग्णांच्या नोंदीतील फरक ध्यानात घेण्याजोगा आहे. मेच्या मध्यावर मुंबईतील कोरोना आकडेवारी एका दिवसासाठी 700 च्यावर आली होती. त्यावेळी असंख्य मुंबईकरांच्या मनात आशेचे धुमारे फुटले होते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा शोध भलेही एक वर्षाने लागो, मात्र कोरोनासोबत जगण्याची हिमत त्या एका दिवसाच्या आकडेवारीने आली होती. त्याच कमी आकडेवारीमुळे राज्य आरोग्य विभागाची आणि महापालिकेची वाहवा झाली होती. धारावी तसेच वरळी कोळीवाडय़ातील कोरोनाच्या माघारीनेही अर्ध कोरोना युद्ध जिंकल्याचा माहौल तयार केला होता. या युद्धात सरकारी यंत्रणेसह सामान्यजनही कोरोना योद्धा म्हणून लढतो आहे. आणि अचानक पुन्हा आकडेवारी फुगताना दिसून येत असल्याने चिंतेत भर पडली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘एसएमएस’ म्हणजे ‘सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर’ या त्रिसूत्रीचा वापर कायम ठेवण्यावर भर दिला. सध्या कोरोनावर प्रतिबंधक लस नसून लस येईपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवल्यास अर्थव्यवस्थेचे काय, ही टोपे यांच्या मनातील चिंताही योग्यच आहे. त्रिसूत्रीपलीकडे जाऊन रुग्णसंख्या कमी होण्यावर काय नियोजन करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. रुग्णालय तसेच प्रशासकीय पातळीवर निसटणाऱया दुव्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाची लढाई लढताना क्वारंटाईन कालावधीबाबत प्रत्येकवेळी वेगवेगळी विधाने ऐकण्यास मिळतात. स्थानिक पातळीवर त्याचा विपर्यास केला जात असल्याचे सणउत्सवांच्या काळात दिसून आले. यात एकवाक्यता नाही. सोयीप्रमाणे क्वारंटाईन कालावधीत शिथिलता आणलेली दिसली. काही जण संसर्ग झाल्यास लपवाछपवीच अधिक करताना दिसतात. ग्रासरूटवर काम करणारे कर्मचारी अशा अनेक तक्रारी करताना दिसून येतात. काही प्रसंगात क्वारंटाईन आणि रुग्णालयात दाखल करावे की करू नये यावरून स्थानिक राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी डॉक्टर करतात. क्वारंटाईन नियमांना सर्रास बगल दिली जात आहे. असिम्प्टोमॅटिक पण पॉझिटिव्ह रुग्णांबाबत तर गोंधळच सुरू आहे. लोक ऐकत नाहीत असे सरकारी यंत्रणेतील अधिकारी हताशपणे सांगतात. मात्र हा हताशपणा हास्यास्पदही वाटतो. निव्वळ विरोध करून क्वारंटाईन कालावधी कमी केला जाऊ शकतो किंवा रुग्णालयात दाखल होणे टाळले जाऊ शकते, याची खात्री झाल्यावर कोरोना संसर्ग खरा की खोटा असा खोचक प्रश्न सरकारला हेच लोक विचारूही शकतात. आणि सध्या हा प्रश्न विचारून खिल्लीही उडवली जात आहे. दुसरे म्हणजे बाधित रुग्णाच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्याही काही ठिकाणी कमी असल्याचे आढळते. मुंबईत एका बाधित रु णामागे त्याच्या संपर्कातील किमान संपूर्ण सोसायटी किंवा चाळ तपासली जाते. यात किमान 25 ते 30 व्यक्ती असतात. त्यांच्यातील प्राथमिक तसेच आजार इतिहासाची तपासणी केली जाते. मात्र राज्यातील आतील भागात तसे होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.
तिसरा मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात आहे. मात्र सर्वसामान्यांनी अनलॉकचा अर्थ कोरोना संपला असाच घेतला आहे. या ‘अनलॉक’ शब्दाला ‘विश्रांती’ असा पर्यायी शब्द सरकारने वापरला असता तर अधिक सयुक्तिक ठरले असते. सरकारी कार्यालयांमध्ये 30 टक्के उपस्थितीत कामे सुरू आहेत. मात्र खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी प्रमाण वापरले जात आहे का, की त्याहून अधिक उपस्थिती या आस्थापना अपेक्षा करत आहेत, हा प्रश्न आहे. याचे उत्तर अनलॉक तीनच्या टप्प्यानंतर बसमधील गर्दीवरून मिळते. ही माहिती सध्या कोणीही खासगी कर्मचारी देऊ शकतो. अशा प्रवासातून तो घरी जाताना कोरोना संसर्ग घरी घेऊन जात नसेल का हा यक्षप्रश्न आहे.
त्यासोबत कोरोना संसर्गाचे ट्रेसिंग करणारे तळागाळातील सरकारी यंत्रणेतील कर्मचारी समाधानी आहेत का? त्यांच्या असमाधानाचे कोरोना ट्रेसिंग कामावर परिणाम होत असेल का? जर तसा होत असेल तर रुग्णसंख्या वाढीस तेही कारण पुरेसे आहेच. गेल्या सहा महिन्यात कोरोना चाचण्या वाढविल्याने संसर्ग शोधला जात आहे. त्यातून उपचारातही बदल केले जात आहेत. आवश्यक आणि जीवनदायी उपचारांमुळे मृत्यूदरही आटोक्यात असल्याचे सांगितले जात आहे.
राम खांदारे