ऑनलाईन टीम / मुंबई :
देशासह महाराष्ट्र राज्यही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मुंबई, पुणे यासह महाराष्ट्रातील अनेक शहरे या विषाणूच्या विळख्यात सापडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून आश्वासक कामगिरी केली आहे. काही ठिकाणी विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यात राज्य सरकारला यश आलं असलं तरीही काही ठिकाणी परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.
27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले, शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानावर गर्दी करु नका. तसेच आपल्या वाढदिवशी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, प्लाझ्मा दान शिबीरांचं आयोजन करावे. त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ देणगी द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपण दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. 27 जुलै रोजी म्हणजेच आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले.