प्रतिनिधी/ कराड
लॉक डाऊनच्या काळातील वीज बिले आली असून ती वाढीव आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून याबाबत वीज बिलाबाबत नगराध्यक्षांनी रोहिणी शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱयांबरोबर चर्चा केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वीज बिले ग्राहकांना देण्यात आली नव्हती. सदर बिलांचे वाटप सध्या सुरू केले असून ही वीज बिले वाढीव दराने आकरण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांच्यात प्रचंड नाराजी असून लॉकडाऊनमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ही बिले भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अन्यायकारक बिलांसंदर्भात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱयांबरोबर सविस्तर चर्चा केली. बिले अन्यायकारक असून आधीच अडचणीत असलेल्या जनतेने सदरची बिले भरायची कशी, असा सवाल त्यांनी केला. याबाबत सर्वमान्य असा तोडगा काढून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नथुराम कुंभार यांनीही भाग घेतला.यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजितकुमार नवाळे, शिवजीत पाटील, संदीप पांढरपट्टे, तुषार खराडे, प्रमोद धुमाळ उपस्थित होते.