तिन्ही ऋतुंने बिघडवले आरोग्य; व्हायरल इन्फेकश्नचा धोका
नीलेश काळे / कोल्हापूर
गेल्या चार दिवासांपासून शहरासह जिल्ह्यात वातवरणात बदल झाला आहे. या बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सतत होत असलेल्या वतारवणीय बदलाने दिवसभर तीन्ही ऋतांचा परिणाम जाणवत आहे. पावसाच्या सरी, अधनु मधुन कडक ऊन, यातच सुरु असलेली थंडी असा तिन्ही ऋतुंचा सामना नागरिकांना करावा लागत असून याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. अंगदुखी, सर्दी, खोकला आदी रोगांचे रुग्ण वाढत आहेत. आशा वातवरणीय बदलामुळे लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत.
शहरासह ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून कडक ऊन, मध्येच पावासाच्या सरी याबरोबरच वाढणारी थंडी असे संमिश्र वातावरण निर्माण होत असल्याने शासकीयसह खाजगी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. या वातावरणामुळे अशक्तपणा, घासादुखी, अंगदुखी, तापाचे रुग्ण वाढत असल्याचे खासगी व शासकीय डॉक्टरांकडून समजते. लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. हृदयविकार, मधुमेह, संधीवात असणार्या ज्येष्ठांना याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी आणि खोकला वाढला आहे.
उष्म्याने वाढले डास, खबरदारी घेण्याची गरज
जिल्ह्यात वातावरणीय बदलाने डासांची संख्या वाढली आहे. दिवसभर उष्मा होत असल्याने डासांच्या संख्येतही वाढ झाल्याचे नागरिक सांगतात. साहजिकच डासांमुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढण्यास वातावण पोषक झाले आहे. अंगदुखी, सर्दी, ताप , डोके जड होणे अशी लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधे घेण्याची गरज आहे. कोरानाचा संसर्ग असल्याने कोणत्याही घरगुती उपचार न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक बनले आहे.
कोराना झाला कमी, सर्दी, खोकल्याचे वाढले रुग्ण
जिल्हयात कोरानाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र अचानक वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढत आहेत. सकाळी ऊन, दुपारी पाऊस अन रात्री जोरदार थंडी अशा तिन्ही ऋतुंनी मानवी आरोग्य बिघडवले आहे. या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन मोठया प्रमाणात होत आहे.
गेले काही दिवस वातावरणीय बदल झपाट्याने होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत वाढ होत आहे. रुग्णांनी कोविड संसर्ग असल्याने मास्क हा वापरलाच पाहिजे. स्वतःहून घरगुती उपचार, अथवा औषध दुकानातील गोळया घेणे टाळावे. त्यामुळे कोणतेही लक्षणे जाणवताच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावा. स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. पौष्टिक आहाराचा रोजच्या जेवणात वापर करावा.
– डॉ.विद्यानंद शिरोलीकर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, कळे आरोग्य केंद्र