प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक करण्यात आला असताना देखील सातारा जिल्हय़ाची सीमा तोडून येण्यास येस बँक घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी उद्योगपती वाधवान बंधुंना कुटुंबकबिल्यासह परवानगी देणाऱया आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्तांवर ठाकरे सरकार मेहरबान झाले आहे. आता त्यांना स्थलांतरित कामगार, विद्यार्थी व यात्रेकरुंना पाठवणाऱया समितीचे अध्यक्षपदच बहाल केले असून यामुळे जिल्हय़ासह राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्हाबंदी असताना येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱयात अडकलेले आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी जाण्याच्या परवानगी देण्याचे अधिकार त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले.
काही दिवसांपूर्वी येस बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा-लोणावळा येथे खाजगी कार्यक्रमासाठी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर तेथून त्यांना महाबळेश्वर येथे जाण्याची परवानगी आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च्या जबाबदारीवर दिली होती. मात्र सातारा येथील पोलिसांनी याप्रकरणी उलट तपासणी करताच हे सर्व प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर अमिताभ गुप्ता यांच्याबाबत उलट-सुलट चर्चांना सुरुवात होत त्यांना सक्तीच्या रजेवर राज्य सरकारने पाठविले.
परंतु आता पुन्हा गुप्ता यांच्याकडे स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना-अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याच्या समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली. ही समिती पोलिसांकडे आलेल्या अर्जाची यादी बनविणे आणि त्यांना पाठविण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी या समितीवर राज्य सरकारने सोपविली आहे. तसेच या कामासाठी आवश्यक लागणारे मनुष्यबळ पुरविण्याचे कामही या समितीवर सोपविण्यात आले असल्याने सरकारच्या या निर्णयाबद्दल राज्यासह सातारा जिल्हय़ात आश्चर्य व्यक्त होत आहे.