अतिवाडमधील घटना, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
इंदिरानगर अतिवाड येथील एका राहत्या घराचे पत्रे उडून गेल्याने संसार उघडय़ावर पडला आहे. रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे ही घटना घडली आहे. कृष्णा लक्ष्मण पाटील असे घरमालकाचे नाव आहे. छतच उडून गेल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीय संकटात सापडले आहे. तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मागील आठवडय़ापासून वादळी पावसाचा तडाखा सुरू आहे. रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे राहत्या घरावरील छतच उडून गेले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांसमोर निवाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय घरावरील पत्रे उडून गेल्याने घरातील संसारोपयोगी कपडे, भांडी आणि अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः वर्षभरासाठी साठून ठेवलेल्या भाताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. तलाठी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.