सांगरुळ / प्रतिनिधी
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या करवीर तालुक्यातील घरांचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. अशा सूचना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांनी तहसीलदार करवीर यांना केल्या आहेत.
करवीर तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसाबरोबर जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने तालुक्यातील बोलोली, उपवडे ,आरडेवाडी, शिपेकरवाडी, दुर्गळवाडी, पासार्डे, नाव्ह्याची वाडी आदी गावातील सुमारे ४६ घरांचे तसेच बहिरेश्वर येथील सात – आठ घरांचे पत्रे उडून ग्रामीण भागातील लोकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांची कौले उडून गेल्याने घरात पाणी गेले. त्यामुळे प्रापंचिक साहित्य, जळाऊ लाकूड, जनावरांची वैरण, धान्य आदी भिजून नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पोल्ट्री हाऊस , ग्रीन हाऊस, लाकडाच्या वखारी यांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीच्या या पार्श्वभूमीवर करवीरचे आमदार पी. एन.पाटील यांनी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे- भामरे यांना संपर्क करून झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लोकांना लवकरात लवकर मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या. तसेच लॉकडाउनच्या परिस्थितीत नुकसान झालेल्या नागरिकांना घरांची दुरुस्ती करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याकडेही लक्ष देऊन त्यांना सहकार्य करण्यास सांगितले. तहसीलदार मुळे – भामरे यांनीही सर्कल, तलाठी यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेआहेत.