वादळवारे, विक्रमी पाऊस अन् कडाक्याची थंडी…
2020 हे वर्ष अनेकार्थांनी गाजत आहे. कोरोना, लॉकडाऊन, राजकीय कुरघोडय़ांबरोबरच हवामानाच्या पातळीवरही सरते वर्ष ‘वादळ’ग्रस्त ठरले आहे. या वर्षभरात ‘निसर्गा’चेही रौदरूप भारतवासीयांना अनुभवायला मिळाले. भारतीय भूभागावर धडकलेली अनेकविध वादळे, त्याचा वातावरणावरचा इफेक्ट, शेती-पीकपाण्याचे झालेले नुकसान पाहता हवामानीयदृष्टय़ा हे वर्ष उलथापालथ घडविणारेच म्हटले पाहिजे.
भारताचा बहुतांश भूभाग हा पाण्याने वेढलेला आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर यामुळे भारतीय किनारपट्टीला धडकणारी वादळेही जास्त. त्यातही पूर्व किनारपट्टीवर वादळे मोठय़ा प्रमाणात येतात. गेल्या काही वर्षात वादळांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
भारतातील वादळप्रवण क्षेत्रे
किनारपट्टीवरील तसेच लगतच्या भागातील एकूण 96 जिल्हे वादळप्रवण क्षेत्रात येतात. त्यातील 12 अतिधोकादायक, 41 धोकादायक, 30 मध्यम धोकादायक, 13 कमी धोकादायक अशी वर्गवारी करण्यात आली आहेत. यात अतिधोकादायकमध्ये पश्चिम बंगालमधील दक्षिण व उत्तर 24 परगणा, मेदिनीपूर, कोलकाता, ओडिशातील बालासोर, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर, आंध्रप्रदेशातील नेल्लोर, कृष्णा, पूर्व गोदावरी तसेच पाँडिचेरीतील येनेम जिल्हय़ांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हय़ांचा समावेश असून, पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत हे जिल्हे कमी धोकादायक आहेत. दीव दमणमधील दीव, गुजरातमधील जुनागड व कच्छ हे जिल्हेही धोकादायक वर्गात येतात.
वादळांना नाव देण्याची प्रक्रिया
अरबी समुद तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱया वादळांना नावे देण्याची प्रक्रिया सोपी नाही. बंगाल तसेच अरबी समुद्र अनेक देशांशी जोडला गेला आहे. त्यामुळे या भागात निर्माण होणाऱया वादळांची नावे निश्चित करताना संबंधित देशांनाही बरोबर घेतले जाते. जागतिक हवामान संस्थेच्या जगभरात सहा रिजनल स्पेशलाईज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स (आरएसएमसी) तसेच पाच रिजनल ट्रॉपिकल सायक्लोन वॉर्निंग सिस्टीम्स (टीसीडब्ल्यूसी) आहेत. या संस्था हवामानाच्या माहितीसोबतच वादळांना नावे देण्याचे काम करतात. या संस्थांमधील भारतीय हवामान संस्था ही एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. दिल्लीतील आरएसएमसी विभाग बंगाल तसेच अरबी समुद्रात निर्माण होणाऱया वादळांना नाव देण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे. हाच विभाग चक्रीवादळ विकसित होण्याबरोबरच त्याची प्रगती, तीव्रता, वेग, त्याचे परिणाम, नुकसान, सतर्कता याबाबत नागरिकांना सतर्क करीत असतो. भारताबरोबरच बांग्लादेश, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब, येमेन या देशांची समिती वादळांना नावे देते.
वादळांना नाव का दिले जाते…?
- प्रत्येक वादळाला नाव दिल्याने त्याचा प्रवास तसेच त्याची माहिती देणे सोपे जाते.
- एकाच समुद्रात एकाच वेळी दोन वादळे निर्माण झाल्यास त्यातील गोंधळ टाळण्यासाठी याचा उपयोग होतो.
- वादळ सहजरीत्या लक्षात राहण्यास मदत होते.
- वादळासंबंधित सूचना, इशारा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभ बनते.
2004 साली तयार झालेल्या वादळांची यादी मे 2020 पर्यंत चालली. अंफान हे त्यातील शेवटचे वादळ ठरले. ही यादी संपत येत असल्याने ओमान येथे सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या जागतिक हवामान विभागाच्या बैठकीमध्ये वादळांच्या नवीन नावांची यादी तयार करण्याचे निश्चित झाले. तसेच यात पाच नवीन देशांनाही समाविष्ट करण्यात आले. यापूर्वी केवळ आठ देशांची समिती बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रातील वादळांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत होती. सर्व प्रक्रियेनंतर एप्रिल 2020 मध्ये वादळांच्या नावांची नवीन यादी जाहीर करण्यात आली. यापूर्वी तयार झालेल्या यादीतील शेवटचे वादळ हे अंफान होते, तर नवीन यादीनुसार पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले ‘निसर्ग’ हे पहिले चक्रीवादळ ठरले. बांग्लादेशने हे नाव दिले होते. अल्फाबेटिकली देशांच्या नावानुसार वादळाची नावे वापरली जातात. नुकतेच दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीला धडकलेले बुरेवी या वादळाचे नाव मालदीव या देशाने दिले होते. या नवीन यादीत प्रत्येक देशाने 13 नावे दिली असून, एकूण 169 नावांचा यात समावेश आहे. भारताच्या यादीत सर्वसामान्य नागरिकांनी सुचविलेल्या नावांचाही समावेश आहे.
नाव निश्चितीचे निकष
1. वादळाचे नाव राजकीय पक्ष, चिन्ह, धर्म, संस्कृती याच्याशी संबंधित नसावे.
2. कुणाच्याही भावना दुखावणारे नाव असता कामा नये.
3. निसर्गाला क्रूर वा कठोर ठरविणारे नाव नसावे.
4. वादळाचे नाव जास्तीजास्त आठ कॅरेक्टरचे, उच्चारण्यास सहज, सोपे असावे.
5. आधी दिलेली नावे परत दिली जाऊ नयेत. पूर्णपणे नवीन नावे असावीत.
2019 सालची वादळे
2019 साली 8 वादळे आली. त्यातल्या त्यात पूर्व किनारपट्टी ही जास्त वादळे धडकणारी. 2019 साल हे मात्र त्याला अपवाद ठरले. 2019 मध्ये अरबी समुद्रात 5 वादळे निर्माण झाली, तर बंगालच्या उपसागरात 3 वादळे आली. अरबी समुद्रातील क्यार हे महाचक्रीवादळ, तर महा, वायू, हिक्का, पवन ही त्या तुलनेत कमी तीव्रतेची वादळे ठरली. बंगालच्या उपसागरातील पाबुक, फनी, बुलबुल ही बंगालच्या उपसागरातील वादळे ठरली.
2020 मधील वादळे
आतापर्यंत पाच वादळे 2020 साली नोंदविण्यात आली. अंफान, निसर्ग, गती, निवार, बुरेवीअशी वादळे होत. किंबहुना त्यांची तीव्रता पाहता त्यांनी अवकाश व हे वर्ष व्यापल्याचे दिसून येते.
अंफान चक्रीवादळ : मे महिन्यात नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनच्या निर्मितीच्या आसपास अंफान वादळ अंदमानच्या समुद्रात निर्माण झाले. यामुळे मान्सूनच्या गतीला काही काळ ब्रेकही लागला. बंगालच्या उपसागरात प्रवेश करीत पुढे पश्चिम बंगाल व बांग्लादेशला या वादळाने झोडपले. यामुळे पश्चिम बंगाल व बांग्लादेशमध्ये मोठे नुकसान झाले.
निसर्ग चक्रीवादळ : जून महिन्यात पश्चिम किनारपट्टीला धडकलेले हे या वर्षातील सर्वांत मोठे चक्रीवादळ. मुंबईजवळ अलिबागच्या किनारपट्टीला हे वादळ धडकले. या प्रलयंकारी वादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पुणे, नगरच्या पट्टय़ातही याचा प्रचंड प्रभाव जाणवला. 2009 सालानंतर मुंबईला नुकसान पोहचविणारे हे वादळ ठरले.
गती चक्रीवादळ : नोव्हेंबरमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे गती या चक्रीवादळात रुपांतर झाले. मात्र, पुढे हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात सोमालियाच्या किनारपट्टीला धडकले. समुद्रात असतानाच या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने किनारपट्टीपर्यंत जाईपर्यंत याचा प्रभाव कमी झाला.
निवार चक्रीवादळ : नोव्हेंबर अखेरला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे वादळ तामिळनाडू व पाँडिचेरीच्या किनारपट्टीदरम्यान धडकले. यामुळे तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र किनारपट्टीच्या भागात मोठे नुकसान झाले.
बुरेवी चक्रीवादळ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुरेवी चक्रीवादळ सर्वात आधी श्रीलंकेला धडकले. त्यानंतर पुन्हा मन्नारच्या आखातात उतरले. भारतीय किनारपट्टीपर्यंत येईपर्यंत याचा प्रभाव पूर्णपणे ओसरला होता. मात्र, यामुळे तामिळनाडू, दक्षिण केरळ किनारपट्टीला मुसळधार पावसाने झोडपून काढले.
मान्सूनचे आगमन, परतीच्या तारखा बदलल्या
सरते वर्ष आणखी एका स्तरावर महत्त्वपूर्ण ठरले आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे भारतातील विविध ठिकाणचे सर्वसाधारण आगमन, त्याचा प्रवास तसेच परतीच्या मान्सूनच्या तारखा बदलल्या आहेत. सध्या प्रचलित असलेल्या तारखा या भारतातील केवळ 149 ठिकाणच्या व 1901 ते 1940 निरीक्षणावरून करण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस मान्सून लहरी होत असून, त्याच्या तारखांमध्येही बदल होत आहे. याची नेंद घेऊन यंदाच्या वर्षीपासून या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी 1961 ते 2019 दरम्यानच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला असून, परतीच्या मान्सूनसाठी 1971 ते 2019 दरम्यानच्या तारखांचे विश्लेषण करण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनच्या पश्चिमेकडील शाखेचे आगमन लांबले
नवीन आगमनाच्या तारखेनुसार मान्सूनच्या पश्चिम शाखेचे आगमन हे थोडे लांबलेले राहणार आहे. नवीन वेळापत्रका केरळात 1 जून अर्थात त्याच्या आधीच्या तारखेनुसार येणार असला, तरी पुढे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशच्या काही भागात त्यात अंतर वाढत जाणार आहे. तर देशाच्या वायव्येकडील काही भागात मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे. परतीच्या मान्सूनला वायव्य भागातून सुरुवात होते. नवीन वेळापत्रकानुसार, तो 8 ते 15 दिवस उशिरा परतण्यास सुरुवात करेल. मात्र, दक्षिण भारतातील 15 ऑक्टोबर ही मान्सूनच्या परतीची शेवटची तारीख आधीप्रमाणे कायम असेल.
वादळ, पाऊस अन् कडाक्याची थंडी
कोरोनाशी लढणाऱया भारतीयांचे जनजीवन 2020 मध्ये वादळवारे, विक्रमी पावसामुळेही काहीसे विस्कळीत झाले. देशाच्या बहुतांश भागांत या वर्षी जोरदार पाऊस झाला. आता उत्तर भारतापासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंत कडाक्याच्या थंडीचा तडाखाही जाणवत आहे. वर्षअखेरीस व नव्या वर्षाला सामोरे जात असताना थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे बघता सरते वर्ष निसर्गाच्या विविध आविष्कारांचे दर्शन घडविणारे ठरले आहे.
– अर्चना माने-भारती, पुणे