तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
दिनांक सहा ऑगस्टच्या सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने आणि रात्रभर राहिलेल्या पाऊस व वादळी वाऱ्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक उभी पिके जमीनदोस्त झालेले पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, भुईमूग, ऊस, मुग ,उडीद, पिकांचे नुकसान झाले असून आधीच कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊन मुळे शेतकरी आज आर्थिक अडचणीत आलेला असताना आता नैसर्गिक आपत्तीने परत अडचणीत सापडला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्व बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला गेली चार महिने कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच सुरुवातीला या वर्षीच्या पावसाच्या हंगामामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेकांनी परत जोमाने आपली शेती करण्यास सुरुवात केली होती. खरिपाचा हंगाम चांगलाच बहरलेला सर्वदूर पाहायला मिळत होता. मात्र दिनांक सहा ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बार्शी तालुक्यात पावसाचे आगमन झाले. हा पाऊस आणि ह्या पावसाबरोबर वाहणारे वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील अनेक पिकांचे भरघोस नुकसान झाले आहे. एकीकडे उडीद काढायला आलेला असताना शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने या उडीद पिकावरती रोग तर पसरलाच. पण पाणी जास्त झाल्याने या ठिकाणची पिके करपून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील उभा असलेला ऊस या वादळी वाऱ्याने आणि पावसाने जमिनदोस्त झालेला पाहायला मिळत आहे. महागाव शिवारातील तांदुळवाडी या गावाजवळ गणेश भारत मोरे या शेतकऱ्यांच्या शेतामधील सुमारे अडीच एकर उभा असलेला आणि बहरलेला ऊस पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. याबाबत शेतकरी गणेश मोरे यांनी दैनिक तरुण भारत संवादला माहिती दिल्याप्रमाणे अजून पर्यंत त्यांच्या शिवारात तहसील प्रशासन अथवा कृषी विभागाने भेट दिलेली नाही किंवा याची दखल घेतलेली नाही. सुरुवातीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या वाऱ्याने शेतकऱ्यांचा उभा ऊस पूर्ण आडवा झालेला असल्याने परत एकदा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला पाहायला मिळत आहे. तरी याबाबत कृषी विभाग व तहसील प्रशासनाने पंचनामे करून या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी आशा शेतकरी वर्गातून पल्लवित होत आहे.