दहा आमदार अपात्रता प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या लढय़ाची दिशा आता पुढील सुनावणीवेळी ठरणार आहे. वादी-प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे आपले लेखी म्हणणे मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर करावे लागणार आहे.
सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर गिरीश चोडणकर यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये दहा आमदारांविरोधात अपात्रता याचिका सादर केली होती. सभापती निवाडा देण्यास दिरंगाई करीत असल्याचे जाणवताच चोडणकर यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व दीड वर्षानंतर सभापतींनी निवाडा दिला. काँग्रेस पक्षातून विभक्त होऊन भाजपात विलिन झालेल्या दहा आमदारांना अपात्र ठरवावे म्हणून लगेच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सदर आमदारांकडून अजून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. पुढील सुनावणीपूर्वी सदर उत्तर देण्याचे आश्वासन प्रतिवाद्यांच्यावतीने देण्यात आले आहे. गिरीश चोडणकर यांच्या या लढय़ाला प्रतिवाद्यांनी उत्तर दिल्यानंतर या लढय़ाची पुढील दिशा ठरणार आहे.