मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सहभागी संघांना वानखेडे स्टेडियमवर रात्री 8 नंतर सरावाची परवानगी दिली आहे. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू आहे. त्यामुळे, रात्री 8 नंतर सराव व त्यासाठी करावा लागणारा प्रवास या दोन्हीची स्वतंत्र परवानगी संघांना दिली गेली. मुंबईत व महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
‘सीसीआय व एमसीए येथे दुपारी 4 ते 6.30 व सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या दोन सत्रात संघ सराव करु शकतील’, अशी सध्याची योजना आहे. यंदा मुंबईत आयपीएलचे 10 सामने होणार असून त्यातील 9 सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरु होतील. वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना दि. 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
‘त्या’ सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
यापूर्वी वानखेडे स्टेडियमवरील 10 ग्राऊंड स्टाफ सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून यामुळे हा मुंबई क्रिकेट संघटनेसाठी मोठा दिलासा ठरला आहे.