तीन वेळा यशस्वीरित्या केली नर्मदा परिक्रमा.पायी ‘अध्यात्म भारतभ्रमण’ करत गोव्यात दाखल : सुखद-वांते येथे मार्गदर्शन, चातुर्मास व्रताचरण
राजू भिकारो नाईक /पणजी
आजच्या आधुनिक काळात पुण्यातील अध्यात्मलीन, अखंडसौभाग्यवती शर्मिलाताई श्रीपाद पागे यांनी संसारिक, कौटुंबिक मोहमायेच्या बंधनातून मुक्त होऊन, धनदौलत दगन करुन विरक्तपणे आधुनिक वानप्रस्थाश्रमांतर्गत ‘अध्यात्मिक भारत भ्रमण’ सुरु करुन स्त्रियांना फार मोठा संदेश दिला आहे. पायी भ्रमण करत त्या गोव्यात पोहोचल्या असून सध्या सुखद-वांते येथे त्यांचे चातुर्मास व्रताचरण सुरु आहे.
सुखद येथील ब्रह्मचैतन्योपासना केंद्राचे ट्रस्टी तसेच गोंदवलेकर महाराजांचे भक्त विनायक नवाथे सावईकर यांच्या निवासस्थानी शर्मिलाताईंचा निवास असून तिथेच त्यांचा चातुर्मास सुरु आहे. हे व्रताचरण संपल्यानंतर त्या पुढील प्रवासास निघणार आहे. खांद्यावर एक बॅग व हाती काठीच्या सहायाने हा सगळा प्रवास त्या पायी करतात. त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही, उलट ‘सारं जगणंच कसं चैतन्यमय होऊन गेलंय’, असे त्या म्हणाल्या.
वानप्रस्थाश्रमाला आधुनिक आयाम
प्राचीन काळात पुटुंबतील कर्ता पुरुष पारिवारिक जबाबदाऱया पार पाडल्यानंतर म्हणजे आपल्या मुलांना त्यांच्या पायावर जगण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केल्यानंतर तो कर्ता पुरुष वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा. उर्वरित आयुष्य वनात जाऊन घालवायचे आणि तेथेच देह ठेवायचा. राजे, महाराजेही राज्याच्या कार्यभाराची जबाबदारी युवराजाकडे सोपवून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे. मात्र त्यासाठी प्रापंचिक मोहबंधनातून मुक्त होण्याचा मोठा धाडसी निर्णय घेण्यासाठी तेवढी मानसिक क्षमता असावी लागायची. शर्मिलाताईंनी आजच्या व्यामिश्र जीवनात वानप्रस्थाश्रमाचा धाडसी निर्णय घेऊन मोहात, भोगात अडकलेल्या आजच्या समाजात वानप्रस्थाश्रमाला आधुनिक आयाम प्राप्त करुन दिला आहे.
देवभूमी-पुण्यभूमी गोव्याला पाय लाभले
गोवा म्हणजे गोमंतक ही देवभूमी… पुण्यभूमी आहे, आणि आपले पाय येथे लागले हे परमभाग्य गोंधवलेकर महाराज, स्वामी समर्थ, माता नर्मदा व अन्य संतमहंताच्या कृपेमुळे लाभले, असे शर्मिलाताई मानतात. देशभरातील संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक विश्वात रमलेल्या शर्मिताईंवर बालपणापासूनच आधत्मिक संस्कार झाले. मुंबईतील लालबाग येथे जन्म झाल्यानंतर त्यांना संस्कारी आईवडिलांबरोबरच आजी-आजोबाही लाभले. ‘सर्वच मुलांना असे संस्कार मिळायला हवे. मुलांकडे दुर्लक्ष करुन पद, प्रतिष्ठा, पैसा काय उपयोगाचा? आईवडिलांची खरी धनदौलत मुलं आणि मुलांची आईवडिल. हीच आपली वैभवशाली भारतीय परंपरा!
… तरीही तांब्यातील पाणी संपले नाही
वडिल विश्वनाथ कडदेशमुख स्वामी समर्थांचे भक्त होते. एकदा ते 75 सहकाऱयांसह यात्रेला जाताना वाटेत तहानलेल्यांना पाणी कुठेच मिळेन. जीव कासावीस झाला होता. तेवढय़ात पाण्याचा तांबा घेऊन मुलगा प्रकटला. आश्चर्य म्हणजे एकाच तांब्यातील पाणी सर्व यात्रेकरु प्यायले, तरीही पाणी संपले नाही. त्या मुलाच्या रुपात आलेल्या स्वामी समर्थानी क्षणात त्या सर्वांना दर्शन दिले. एवढी आमच्या बाबांवर समर्थांची कृपा होती, असे शर्मिलाताई सांगतात.
नर्मदेशी लीन झालेले पागे दांपत्त्य
शर्मिलाताईंना लग्न करुन पुण्याला देण्यात आल्यानंतर त्यांचं जीवन अधिक सुखमय झाले कारण त्यांचे पती श्रीपाद दत्तात्रय पागे हे सुद्ध आध्यात्मिक वृत्तीचेच होते. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दोघही हिमालयात जाऊन साधना करायचे. इस्कॉनचे गुरु गोपालकृष्ण गोस्वामी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती. अध्यात्मात रमलेल्या या दोघांनीही निवृत्तीच्या अगोदरच बँकेच्या नोकऱयांचा त्याग केला. 2001 साली श्रीपादना पडलेले स्वप्न 2003 मध्ये नर्मदा यात्रेत असताना सायंकाळीच्या दिवेलागणीच्यावेळी प्रत्यक्षात उतरले. चंदनखेडा गावात ते वाट विसरले. स्वप्नात जो परिसर दिसला होता, तोच त्यांना आता प्रत्यक्ष भेटला. तोच डोंगर, तीच बाई, तोच मुलगा. या साऱया प्रकारामुळे ते नर्मदेशी लीन होऊन गेले.
पैसा नसला तरी, ती भिकारी नाहीत…
शर्मिलाताई व श्रीपाद यांनी तीनवेळा नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आणि अध्यात्मिक शक्तीच्या अनुभूतीचे संचितही साठविले. जीवशिवाच्या भक्तीचा चैतन्यदायी संगम परिक्रमेत आपण अनुभवला, असे त्या सांगतात. नर्मदामातेने आम्हा दोघांनही आपली मुले मानली. 2013 च्या तिसऱया परिक्रमेदरम्यान मध्यप्रदेशातील मांगरोल गावात नर्मदा माता मंदिर आहे. तेथील संत दादा व दादी यांनी मातेचा त्यांना झालेला दृष्टांत सांगितला. दृष्टांत देवी म्हणाली, या दोघांकडे पैसा नसला तरी, ती भिकारी नाहीत, माझी मुलं आहेत ती!
ब्रह्मलीन सहचराचे भाग्य लाभले
नर्मदा मातेमुळेच आपल्याला आपल्या पतीची त्यांच्या निर्वाणानंतरही सेवा करण्याचे भाग्य लाभले. तिसऱया नर्मदा परिक्रमेत असताना 2013 मध्ये बकानेर-बडा बडदा (मध्य प्रदेश) येथे त्यांनी देह ठेवला आणि ब्रह्मलीन झाले. त्यांना मिळालेले हे भाग्य काही अवघ्याच लोकांना प्राप्त होते. मी माझा सहचर गमावला होता, पण ते मला अखंडसौभाग्यवतीचं दान देऊन गेले होते. आपण गेल्यानंतर वैधव्य स्वीकारायचं नाही. आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही तूच करायचे. अशी सूचना त्यांनी अगोदरच दिली होती. त्यानुसार तेथील संत, अध्यात्मिक गुरु, नर्मदाभक्तांच्या पावन उपस्थित आपण स्वतः सर्व अंत्यविधी केले. त्यानंतर तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवसांत परिक्रमाही पूर्ण केली. पुढे 2016 मध्ये उज्जैनच्या महाकाळेश्वर कुंभमेळय़ात सहभागी झाले. ओंकारेश्वर महामंडलेश्वर स्वरुपानंदांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तीन वर्षे हरिद्वार येथील शांतीकुंजमध्ये आध्यात्मिक अनुभव घेतला. मध्य प्रदेशातील कोटेश्वर येथे लालजीबाबा आश्रमातील पावन वातावरणात नर्मदामातेची अनुभूती घेतली… शर्मिलाताई आपला आध्यात्मिक प्रवास सांगत होत्या.
वनात जाण्यापेक्षा जनात राहून अध्यात्मकार्य
शर्मिलाताई 2021 मध्ये पुण्यात आल्या आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण वनात जाऊन उगा आयुष्य वाया का घालवायचे, म्हणून मग वानप्रस्थाश्रमाला थोडा वेगळा अर्थ देत अध्यात्मिक भारत भ्रमणाचा निर्णय घेतला. मोहपाशातून त्या मुक्त झाल्या. संपत्ती विकून टाकली. आलेले धन दान केले आणि 6 मे 2021 रोजी त्यांनी आधुनिक वानप्रस्थाश्रम सुरु केला. वाटेतील सर्व अध्यात्मिक स्थळांना, मठांना, आश्रमांना भेटी देत अध्यात्माचे ज्ञानकण ग्रहण करत त्या सध्या गोव्यात सुखद-वांते येथे पोहोचल्या आहेत. परिव्राजकता, संन्यासी धर्म हे भारतीय परंपरेचे संचित असून त्यासाठी महान पुरुष-स्त्रियांनी योगदान दिले आहे. शर्मिलाताईंचेही हे योगदान या परंपरेला नवा आयाम देणारीच आहे.