ऑनलाईन टीम / मुंबई :
सरकाचे वाभाडे काढण्यासाठी ‘शॅडो कॅबिनेट’ ची स्थापना करण्यात आली आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसेच्या 14 व्या वर्धापनदिनी आज नवी मुंबईत मेळावा साजरा होत आहे. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेट संबंधी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा. तसेच गुढी पाडव्याच्या दिवशी पुढीची दिशा स्पष्ट करू असं ही ते यावेळी म्हणाले.
गेली 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच गेली 60 वर्षे काँग्रेसची केंद्रात सत्ता होती मात्र, आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. असे असले तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला?
प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.