प्रकल्प बंद केला जावा : 12 जणांच्या मृत्यूप्रकरणी कारवाई व्हावी
विशाखापट्टणम
: आंध्रप्रदेशच्या वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर्सच्या प्रकल्पात झालेल्या वायू गळतीच्या तिसऱया दिवशी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी शनिवारी प्रकल्पाच्या बाहेर निदर्शने केली आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांचे मृतदेह प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवत ही निदर्शने करण्यात आली आहेत. हा प्रकल्प बंद केला जावा आणि 12 जणांच्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तींना अटक केली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने वायूगळती प्रकरणी एलजी पॉलिमर्स कंपनीला 50 कोटी रुपयांचा दंड भरण्याचा निर्देश दिला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. या समितीचे नेतृत्व आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश करणार आहेत. लवादाने एलजी पॉलिमर्स, पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाला नोटीस बजावली आहे.