भारतात 2019 मध्ये 1.16 लाख नवजात बालकांनी गमावले प्राण : गर्भाच्या विकासावरही नकारात्मक परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेच्या एका संस्थेने देशातील नवजात मुलांच्या जीवनावर वायू प्रदूषणाचा घातक परिणाम होत असल्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतात 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे 1.16 लाखाहून अधिक नवजात मुलांचा मृत्यू झाला असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. भारताव्यतिरिक्त नायजेरिया (67,900 मृत्यू), पाकिस्तान (56,700 मृत्यू), इथिओपिया (22,900 मृत्यू) अशा देशांची नावेही या अहवालात समाविष्ट आहेत. अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट इन्स्टिटय़ूटने जारी केलेल्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर-2020 च्या अहवालात वायू प्रदूषण आणि त्यातून होणाऱया नवजात मुलांचा मृत्यू याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
मृत्यूची जैविक कारणे स्पष्टपणे सांगता येत नसली तरी प्रदूषणाचा विपरीत परिणाम गर्भवती महिला व त्यांच्या मुलांवर झाल्याचे अहवालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, वातावरणाचा देखील सर्वसामान्यांसह कमी वजन असलेल्या मुलांवर जास्त परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गर्भाच्या विकासादरम्यान वायू प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम देखील मुलांच्या आरोग्यावर होतो.
डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार हवेची गुणवत्ता राखली गेली तर आपण सुमारे 1.16 लाख मुलांचा जीव वाचू शकतो, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संचालिका कल्पना बालकृष्ण यांनी म्हटले आहे. मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण खासगी पातळीवर वेगवेगळय़ा उपाययोजना करत असतो. परंतु, प्रदूषण नियंत्रणाची समस्या निपटण्यासाठी संपूर्ण लोकसहभागाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वायू प्रदूषण मृत्यूचे चौथे मोठे कारण
स्टेट ऑफ ग्लोबल एयर रिपोर्ट-2020च्या अहवालानुसार, 2019 मध्ये वाय tप्रदूषण संबंधित हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचा कर्करोग, फुफ्फुसांच्या इतर आजारांमुळे जवळपास 67 लाख लोकांचा बळी गेला आहे. यापैकी भारतात सुमारे 16.7 लाख लोकांनी वायू प्रदूषणामुळे होणाऱया आजारांमुळे आपले प्राण गमावले आहेत. संपूर्ण जगातील वायू प्रदूषण हे मृत्यू होण्यामागील चौथे मोठे कारण आहे. प्रदूषणाव्यतिरिक्त, खराब आहार आणि धूम्रपान हे देखील लोकांच्या आजाराचे आणि मृत्यूचे मुख्य कारण मानले गेले आहे.
भयावह…
- वायू प्रदूषणाची भारतातील स्थिती पाकिस्तानपेक्षा भयावह
- 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे
- 16.7 लाख लोकांचा मृत्यू
- ‘स्टेट ऑफ ग्लोबल एयर-2020’ अहवालात चिंता व्यक्त