वायू प्रदूषणाची समस्या सध्या प्रत्येकालाच सतावते आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढच्या पिढय़ांना श्वासोश्वासासाठी स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त होऊ शकेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. हवेतील प्रदूषण कमी करून माणसासाठी स्वच्छ हवा पुरविण्याचे तंत्रज्ञान अनेक संस्था विकसित करीत आहेत.
दिल्ली आयआयटीने या संदर्भात एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सुती कपडय़ांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांना हवेतील प्रदूषण शोषणारे कपडे बनविले गेले आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले असून भविष्यकाळात अशा कपडय़ांचे उत्पादन शक्य आहे, असे मत आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी व्यक्त केले.
आयआयटीच्या संशोधकांनी बेन्झिन, स्टर्लिन आणि ऍनिलिन या रासायनिक पदार्थांचा उपयोग करून सुती कपडय़ांचे रुपांतर प्रदूषण शोषणाऱया कपडय़ांमध्ये केले आहे. तसेच अशा प्रकारचे सुती कापडही बनविण्यात आले आहे. या कापडाचे पडदे, खिडक्या, दरवाजे व इतर ठिकाणी वापरात आणल्यास ते हवेतील प्रदूषण शोषून घेऊन खोलीत स्वच्छ हवा खेळती ठेवू शकतात. तसेच हे कपडे आपण परिधानही करू शकतो. आयआयटी दिल्लीने या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी आवेदन पत्र सादर केले आहे. हे कापड किंवा कपडे हवेतून नायट्रस ऑक्साईड, प्रदुषणाचे कण, कार्बनडाय ऑक्साईड, तसेच अन्य विषारी पदार्थ शोषून घेतात. त्यामुळे या प्रदूषणकारी पदार्थांचे हवेतील प्रमाण कमी होऊन हवा श्वसनासाठी योग्य अशा स्वरुपात राहते. या तंत्रज्ञानामुळे साधे सुती कपडेही पर्यावरणाचे संरक्षक बनणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.