15 दिवसात अनेक उड्डाणे रद्द, तोडगा काढण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावर येणारी विमाने वारंवार रद्द होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. अचानक विमाने रद्द होत असल्याचा मेसेज येताच प्रवाशांना पुढील प्लॅनिंग रद्द करावे लागते. मागील 15 दिवसांमध्ये अशी अनेक उड्डाणे रद्द झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने यातून तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
ट्रुजेट ही विमान कंपनी बेळगावमधून तिरूपती, कडप्पा, हैदराबाद व म्हैसूर या चार शहरांना सेवा देते. परंतु मागील 15 दिवसांपासून विमानाची उड्डाणे रद्द केली जात आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुढील प्रवासाचे प्लॅनिंग केलेल्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. विमान कंपनीकडून तांत्रिक कारण देत वारंवार फेऱया रद्द करण्याचे प्रकार होत असल्याने यावर तोडगा बेळगाव विमानतळाने काढावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
एक प्रवासी बेळगावहून तिरूपतीला जाणार होता. परंतु या काही दिवसात दुसऱयांदा विमान रद्द करण्यात आल्याने त्याने आपला संताप व्यक्त केला. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर हळूहळु विमानसेवा पूर्ववत होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे विमाने रद्द होत असल्याने याचा फटका प्रवाशांसोबतच विमानतळालाही बसत आहे. त्यामुळे विमान कंपनीने सुरळीत विमानसेवा देण्याची मागणी करण्यात येत आहे.