विठ्ठलभक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला, जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱयांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तिरी झेंडा पताका फडकल्या नाहीत, हरिनामाचा जयघोष झाला नाही, वारकऱयांना विठू माऊलीचे दर्शन घेता आले नाही. याची देही याची डोळा विठ्ठलाचे रूप मनात साठवता आले नाही.
तासन्तास दर्शनरांगेत उभे राहून माऊलीचे दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱयांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱयांसाठी सचिन सुर्यवंशी यांचे लिखाण असलेले विठ्ठलाचे एक आगळेवेगळे दर्शन अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या सादरीकरणात कोल्हापूर फिल्म कंपनी घेऊन आली. दर्शन ही कोल्हापूर फिल्म कंपनीच्या सचिन गुरव यांची निर्मिती, संकल्पना असून संकलन फैजल महाडिक यांनी केले. पार्श्वसंगीत अमित पाध्ये यांनी दिले असून प्रथमेश रांगोळे यांच्या छायाचित्रणातून हे दर्शन घेता आले. असे हे विठ्ठलाचे आगळेवेगळे दर्शन सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनी विठ्ठल भक्तांचरणी घेऊन आले.