शासनाकडून ४० वारकऱ्यांसहच वारी करण्याचा आदेश जारी
आषाढी एकादशी दिवशी स्थानिक 195 महाराज मंडळींना विठोबाचे दर्शन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत शासनाकडून 40 वारकऱ्यांसहच वारी करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे वारकऱ्यांच्या विरोधानंतरही शासनाच्यावतीने पंढरपूरच्या आषाढी वारीवरील निर्बंध हे कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा पंढरपुरातील स्थानिक 195 महाराज मंडळींना आषाढी एकादशी दिवशी विठोबाचे दर्शन देण्याचा निर्णय शासन आदेशात नमूद आहे.
कोरोनामुळे यंदाची आषाढी वारी देखील प्रतीकात्मक करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला. यामध्ये गेल्या वर्षी दहा मानाच्या संतांच्या पालख्यां केवळ दोनशे वारकरी घेउन पंढरपुरात आले होते. हीच संख्या यंदा दुप्पट करण्यात आली. तर प्रत्येक संतांच्या पालखी समवेत एक एसटी बस जादा देण्याचाही निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी पुणे येथून जाहीर केला.
यानंतर वारकऱ्यांमध्ये आषाढीच्या पायी वारीसाठीची मागणी जोर धरू लागली. वारकरी सांप्रदायिककडून शासनाच्या निर्णयाप्रति नाराजी व्यक्त करीत शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. आणि पंढरपूरला पायी वारीसाठी परवानगी द्यावी. यासाठी शासन घालून देईल. त्या निर्बंधात वारकरी संप्रदाय पंढरपूरची पायी वारी करेल. अशी मागणी वारकरीकडून शासनाकडे झाली. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी बाबत वारकऱ्यांनाप्रति विचार करूनच शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे वारकर्यांनी यंदाची वारी ही घरात राहूनच साजरी करावी असे आवाहन शासनाकडून झाले. तरीदेखील वारकरी हे पायी वारी वर ठाम होते. अशातच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आषाढीवारी बाबतचा सर्वंकष आदेश नुकताच जारी केला. त्यामुळे वारकऱ्यांच्या मागण्यांना बगल देऊन यंदाही थेट पायीवारी न करता प्रतीकात्मक पद्धतीने आरोग्यदायी आषाढी वारी करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे आदेशावरून दिसून येत आहे.