प्रतिनिधी / फोंडा :
वारखंडे-फोंडा येथे धालोत्सवानिमित्त रविवार 12 रोजी रात्री 12 वाजता वीरभद व रथोत्सव होणार आहे. सात दिवस सुरु असलेल्या धालोत्सवाचे वीरभद्र हे खास वैशिष्टय़ आहे.
अंकुश रामराय नाईक हे वीरभद्र साकारणार आहे. हातात पलीते व तलवारी घेऊन पारंपारीक वाद्याच्या तालावर नाचणारा धीरगंभीर वीरभद्र पाहण्यासाठी येथे लोकांची मोठी गर्दी होत असते. प्रेमानंद बा. नाईक व इतर युवा कलाकार वीरभद्राची विविध नावे घेऊन त्याला उद्युक्त करतात. धालो मांडावर पोचण्याआधी त्यांच्या हातात तलवारी देण्यात येतात. अंगात अवसर आलेल्या वीरभद्राचे रुप यावेळी अधिकच धीरगंभीर होत असते. मांडावरील तुळशी वृंदावनाला काही फेऱया मारल्यानंतर त्यांच्या कपाळाजवळ श्रीफळ वाढवून त्याला शांत केले जाते. वीरभद्रानंतर सुवारी वादनाने रथोत्सव होणार आहे. त्यानंतर महिलांतर्फे परत धालो खेळल्या जातील. सोमवार 13 रोजी दुपारी धालोत्सवाची सांगता होणार आहे.