जेष्ठ संपादक संजय आवटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण : डॉ. निशा मुडे-पवार, कृष्णात पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी/इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील श्री वारणा शिक्षण संस्था संचलित वारणा महाविद्यालय वृत्तपत्रविद्या संवाद शास्त्र विभागाच्या वतीने यंदाचा साहित्यप्राज्ञ बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तरुण भारतचे वाळवा तालुका प्रतिनिधी युवराज निकम व शाहुवाडी कापशी येथील तरुण भारतचे प्रतिनिधी बाबासाहेब कदम यांना प्रदान करण्यात आला. जेष्ठ संपादक, विचारवंत संजय
आवटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळयास शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ.निशा मुडे-पवार, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील, प्रा.डॉ.सुमेधा साळुखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृति दिनानिमित प्रत्येक वर्षी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून गेली वीस वर्ष वारणा संकुलातील पत्रकारिता विभागाच्यावतीने वाळवा, शिराळा, शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले या तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो.
निकम यांनी पत्रकारितेमध्ये पंचवीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता केली आहे. सुरुवाती पासून आजअखेर त्यांनी तरुण भारत मध्येच पत्रकारिता केली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शोध पत्रकारिते बरोबरच सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी लेखन केले. प्रशासनातील चुकीच्या कार्यपध्दतीवर त्यांनी निर्भिडपणे आवाज उठवला. या कामाची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याच बरोबर पत्रकार कदम यांनी ही आपल्या लेखणीतून सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.