वारणानगर / प्रतिनिधी
वारणा साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक,गोविंदराव (पापा) बाबासो जाधव वय ६६ रा. येलूर ता. वाळवा जि. सांगली यांचे निधन झाले असून सहकार व सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक हरपल्याने वारणेसह येलूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वारणा सह. साखर कारखाण्याचे संस्थापक संचालक असलेल्या स्व. बाबासो जाधव यांच्या कार्याचा वारसा जपत गोविंदराव जाधव हे पंचवीस वर्षापेक्षा अधिककाळ वारणा साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत होते येलूर सह परिसरातील गांवात पाणी पुरवठा संस्थेची निर्मीती करीत त्यानी हरीत क्रांती केली. दूध संस्था, पतसंस्था, विकास सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले सर्वच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणारे गोविंदराव जाधव सहकार क्षेत्रातील जाणकार अभ्यासू म्हणून तसेच येलूर परिसरातील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.
गोविंदराव जाधव हे वारणा समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांचे अनुयायी व कोरे कुटुंबीयांचे निष्ठावंत कार्यकर्ते होत. सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते स्व.शिवाजीराव देशमुख, जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील, माजी मंत्री आ.विनय कोरेआ.मानसिंगभाऊ नाईक यांचे सोबत राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी चार दशका पेक्षा अधिककाळ कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली येलूर व परिसरातील गावातील विविध संस्था यशस्वी वाटचाल करीत आहेत.वारणा काठच्या अनेक गावात त्यांचा मोठा संपर्क होता.त्यांच्या जाण्याने वारणा उद्योग समूहाचा व परिसरातील जनतेचा एक हक्काचा लोकप्रतिनिधी हरपला असून त्यांच्या जाण्याने वारणा काठी एक पोकळी निर्माण झाली आहे.