प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील वाल्मिकी मंदिराच्या जागेच्या लिज कराराची मुदत संपुष्टात आल्याने सदर जागा हस्तांतर करण्याची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डने बजावली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारवाईमुळे समाज बांधवात नाराजी पसरली असून कारवाईस आक्षेप घेण्यात आला आहे. सदर कारवाई मागे घेऊन मंदिराच्या जागेच्या लिज कराराची मुदत वाढविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मेहतर समाज सुधारणा मंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डला दिले आहे.
कित्येक वर्षांपासून या जागेवर जुने वाल्मिकी मंदिर होते. मेहतर समाज सुधारणा मंडळ आणि भाविकांच्या मदतीने सदर मंदिराचा जीर्णोद्धार 1991 मध्ये करण्यात आला आहे. सदर जागा ब्रिटिश काळात 1912 मध्ये मंदिरासाठी देण्यात आली होती. तेव्हापासून सदर जागेचा उपयोग मेहतर समाज सुधारणा मंडळ करून घेत आहे. मंदिराच्या देखभालीकरिता लागणारा खर्च करण्यासाठी या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत. जुन्या लिज करारांची मुदत वाढविण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाने 2017 मध्ये दिली आहे. त्यामुळे या आदेशानुसार जागेच्या कराराची मुदत वाढविण्याची गरज आहे. संरक्षण खात्याकडून परवानगी न घेताच जागेच्या हस्तांतरासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने पत्र पाठविले आहे. त्यामुळे ही बाब अन्यायकारक आहे. लिज संपुष्टात येण्याबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डने दिलेली नाही. त्यामुळे एसओपीच्या आधारे मंदिराच्या जागेच्या लिजची मुदतवाढ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डकरडे मेहतर समाज सुधारणा मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारवाईमुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून, याबाबत संतापाची लाट पसरली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मंदिरे व प्रार्थना स्थळे आहेत. पण याबाबत कॅन्टोन्मेंटकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मात्र वाल्मिकी मंदिराच्या जागेवर डोळा ठेवून सदर जागा ताब्यात घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रयत्न चालविले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी रहिवासी इमारतींमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने व अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. पण केवळ मंदिराची जागा घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुजाभावामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.