विजय, पराजयबाबत चर्चा सुरू, उद्या मतमोजणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघासाठी 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. दोन्ही मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना किती मते पडतील याबाबत पहिले चार दिवस चर्चा सुरू झाल्या होत्या. चार दिवसानंतर या चर्चाना पूर्णविराम मिळाल्याचे मिळाले. आता मतमोजणी 10 मार्च रोजी होणार असून वाळपई मतदारसंघात नव मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार याबाबत सध्या चर्चेला उधाण आलेले आहे. कोण जिंकतो व कोण हरतो याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.
वाळपई मतदारसंघातून भाजपतर्फे माजी मंत्री विश्वजित राणे, आम आदमी पक्षातर्फे सत्यविजय नाईक, काँग्रेस पक्षातर्फे मनीषा उसगावकर, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे तुकाराम उर्फ मनोज परब, शिवसेनेतर्फे देविदास गावक। महाराष्ट्रवादी गोमंतक व तृणमूल काँग्रेस या युतीचे उमेदवार विश्वेश प्रभू यांनी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे यातील कोण जिंकतो आणि कोण हरतो हे गुरुवार दि. 10 मार्च रोजी मतमोजणीवेळीच स्पष्ट होणार आहे.
वाळपई मतदारसंघातून निवडणुकीत सातत्याने विजयाची परंपरा जपणारे विश्वजित प्रतापसिंह राणे यांना भाजपातर्फे निवडणूक लढविली आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांचे पारडे जड आहे. सातत्याने मतदारांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची बाजू सध्या तरी वरचढ असल्याचे पहावयास मिळत आहे.
सत्यविजय नाईक हे आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवीत असले तरीसुद्धा त्यांनी मागच्या निवडणुकीनंतर मतदारांशी असलेला संबंध बऱयाच प्रमाणात कमी केलेला आहे. यामुळे मतदार त्यांना कितपत प्रतिसाद देतील हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष आज अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अंतिम क्षणी या मतदारसंघातून मनीषा उसगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रचारासाठी अवघेच दिवस मिळाल्यामुळे त्या मतदारांशी चांगल्याप्रकारे संपर्क ठेवू शकल्या नाहीत. यामुळे याचा फटका निश्चितच काँग्रेस पक्षाला बसू शकतो असा मतदारांचा दावा आहे.
मगो व तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विश्वेश प्रभू यांनी निवडणूक लढविली आहे. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आपली प्रतिमा मतदारांसमोर उभी केलेली आहे. यामुळे या कार्यात त्यांना फायदा होणार की नाही हे मतदानाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मिळालेल्या अधिक माहितीनुसार यंदाच्या मतदानामध्ये जवळपास तीन हजार नवीन मतदारांची भर पडलेली आहे. यामुळे या मतदारांचा कल कुणाकडे राहणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना महागाई व इतर अनेक निर्णयामुळे शेवटच्या टप्प्यात जनता जनार्दन नाराज असल्याचे दिसत होते. नवीन मतदार याच रोषाच्या माध्यमातून भाजपाच्या विरोधात मतदान करतील की वाळपईत विश्वजित राणे यांच्या कार्याला प्रभावित होऊन भाजपाला मतदान करतील या सर्व प्रश्नांची उत्तरे 10 मार्च रोजी होणाऱया मतमोजणीवेळी मिळणार आहेत.