आत्महत्येचे कारण अस्पष्ट…
वाळवा / वार्ताहर
वाळवा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ईश्वर सखाराम शिंगटे (वय ६० ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. २२ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास वाळवा इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मळा भागात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आष्टा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शिंगटे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अस्पष्ट आहे. द्राक्ष उत्पादक आघाडीचे शेतकरी म्हणून ईश्वर शिंगटे यांची ओळख होती. त्यांचे मूळ गाव शिंगटेवाडी (ता. शिराळा ) आहे. ते सुमारे तीस वर्षांपूर्वी वाळवा येथील मोहिते मळा भागात त्यांच्या सासरवाडीत राहत होते. त्यांची स्वतःची एकरभर शेती आहे. याशिवाय तीन एकर शेती त्यांनी कसण्यासाठी घेतली आहे.
दोन एकरात द्राक्ष बाग आहे. ते आणि त्याचा मुलगा प्रमोद शेती करत होते. ईश्वर शिंगटे शेतीसाठी अव्याहत राबत होते. शिवाय इतर कोणताही त्यांना त्रास नव्हता, आजार नव्हता. त्यांनी शेतातील कुपनलीकेला विधीवत परडी सोडली. त्यानंतर चुलत मेहुणे अनिल थोरात त्यांच्याशी जवळपास दोन तास गप्पा मारल्या. रात्री आठच्या सुमारास त्यांनी जेवण केले. त्यानंतर ते बागेत फिरायला म्हणून गेले. परंतु दहा वाजले तरी घरी परतले नाहीत म्हणून घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली, तर घरापासून काही अंतरावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. मेव्हणे अमर हनुमंत थोरात यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिसांनी मध्यरात्रीच पंचनामा केला, आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मूळ गावी शिराळा तालुक्यात सकाळी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस नाईक सी. जी. ठाकूर अधिक तपास करीत आहेत.