प्रतिनिधी/ चिपळूण
जुलैमधील विध्वंसक महापुराला कारणीभूत ठरलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी येत्या 6 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय शुक्रवारी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या नागरिक, व्यापाऱयांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. तत्पूर्वी जनजागृतीसाठी शहरात पदयात्रा तसेच उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही करण्याचे ठरले आहे.
शहरात 22 जुलैला आलेल्या महापुराने शहर पुरते उद्ध्वस्त झाले. यात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारीही कोलमडून पडले आहेत. शासनस्तरावरून मिळालेली मदतही तोकडी असतानाच शहरात जलसंपदा विभागाने आखलेल्या लाल व निळय़ा पूररेषेची भर पडली आहे. या नव्या पूररेषेच्या संकटाने शहरासह परिसर हादरला आहे. यावर मात करायची असेल तर वाशिष्ठी गाळमुक्त करणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आल्याने त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गुरूवारी शहर, परिसरातील नागरिक, व्यापारी, अन्य व्यवसायिकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत महापूर, त्यामागची कारणे आणि सध्या शासनस्तरावर सुरू असलेली कार्यवाही यावर चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून माहिती दिली गेली. यानंतर नदीतील गाळ काढण्यावर एकमत झाले. त्यानुसार 6 पासून प्रांत कार्यालयासमोर चिपळूणकरांच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तत्पूर्वी जनजागृतीसाठी बॅनर व शहरात पदयात्रा काढण्याचे ठरवण्यात आले. आंदोलनात्मक पाऊल उचलतानाच उच्च न्यायालयातही जाण्याची तयारी करण्याचे ठरले.
या बैठकीला समितीचे बापू काणे, शिरीष काटकर, अरूण भोजने, समीर जानवलकर, महेंद्र कासेकर, किशोर रेडीज, उदय ओतारी, शाहनवाज शाह, सतीश कदम, शैलेश वरवाटकर, लियाकत शाह, भरत रेडीज, पारस ओसवाल, विश्वास काणे, उमेश काटकर, वासुदेव भांबुरे, कालुस्ते खुर्द सरपंच दाऊद परकार यांच्यासह शहर परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
…