ऑनलाईन टीम / मुंबई :
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीर मंजूर झाला आहे. 2014 च्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी आज वाशी न्यायालयात राज ठाकरे सुनावणीसाठी हजर राहिले होते. त्यावेळी न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्या सोबत हजर होते.
2014 वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान, 26 जानेवारी 2014 ला राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. प्रक्षोभक भाषण केल्याने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी समन्स देण्यात आला होता. त्यांना सुनावणीसाठी आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज राज ठाकरे न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला आहे.