कोकणातील शेतकऱयांचे दिवसाला 50 कोटींचे नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा शेतकऱयांचे अतोनात नुकसान होत आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये सकाळच्यावेळेतच आंबा विक्री होत असल्याने बाजारभाव कोसळून प्रतिदिन पेटीमागे सुमारे 1 हजार रुपयांने बाजारभाव पडत आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे 50 कोटींचे नुकसान होत आहे. त्यासाठी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 एवढा अवधी देण्याची मागणी व्यवसायिक अशोक हांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोकणातून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट व मार्केटच्या बाहेर अशा दिवसाला सरासरी 50 हजार आंबा पेटय़ा दाखल होत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे सकाळी 7 ते 11 याच वेळेत आंबा विक्री होत आहे. विक्रीसाठी ही वेळ पुरत नाही. इतर फळे किंवा भाजीपाला ज्या अवस्थेत येतो त्याच अवस्थेत विकता येतो. पण आंब्याला पिकवावे लागते. यासाठी विक्रीला परवानगी नसली तरीही आंब्याचे ग्रेडींग, सॉटिंग्&ा करण्यासाठी दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंबा निर्यातदारांची ऑफिसेस दिवसरात्र सुरू ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी ‘एक्स्पोर्ट वॉर रूम’ सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये निर्यातीबाबतच्या समस्या ऑन दि स्पॉट सोडवल्या जात होत्या. यावेळी ही सुविधा नाही. त्यातच ग्राहक, माथाडी, कर्मचाऱयांना रेल्वे प्रवास सुविधा नसल्याने मोठी अडचण येत आहे.बाजारातील सर्व घटक एकत्र हजर नसतील तर आंबा नासून जाईल व यामुळे कोकणातले शेतकरी नेस्तनाबूत होण्याची भीती हांडे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.