सावंत मंत्रिमंडळातील मंत्र्याचा अहवाल दिल्लीला : कोणत्याहीक्षणी होऊ शकते कारवाई
प्रतिनिधी /पणजी
एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ मंत्र्याचा सविस्तर अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भाजपच्या नेत्यांनी गोव्यातून पाठविला असून आता केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची ते वाट पाहत आहेत. त्यानंतर लागलीच सदर मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले जाणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
भाजपच्या गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या कार्यालयात काल बुधवारी सायं. 4 वा. झाली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेदेखील उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महामंत्री सतीश धोंड तसेच भाजपचे उच्च पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सदर मंत्र्याला त्वरित काढून टाका, अन्यथा प्रकरण भाजपवर निवडणूक काळातच शेकणार ही वस्तुस्थिती मांडली. बहुतांशजणांनी मुख्यमंत्री व सदानंद शेट तानावडे या दोघांकडे सदर मंत्र्याला मंत्रिमंडळातून त्वरित हटवण्याची मागणी केली.
… तर सरकारची बदनामी टळली असती
वास्तविक मंत्र्याचे हे वासनाकांड प्रकरण मुख्यमंत्र्यांजवळ काही दिवसांपूर्वी जेव्हा पोहोचले होते. तेव्हाच त्यांनी कारवाई केली असती तर सरकारची एवढी बदनामी झाली नसती, असा विचारही काल बुधवारच्या बैठकीत मांडण्यात आला.
तानावडेंनी दिल्लीला पाठविला अहवाल
उपलब्ध माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या बातम्या आणि काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेली टीका या संदर्भातील सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केलेला आहे. आता पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्यानंतरच सदर मंत्र्याला मंत्रिमंडळातून हटविण्यात येणार आहे.
भाजपसमोर गंभीर अडचणी
सदर मंत्री कोण आहे हे सत्य लपून राहिलेले नाही. या अगोदरही सदर मंत्र्याची प्रकरणे संपूर्ण गोवाभर चर्चेत आली होती. मात्र भाजप सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. आता काँग्रेसने भांडाफोड केल्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात सरकारला त्रास होऊ नये याकरिता सदर मंत्र्याला अर्धचंद्र दिला तर हे प्रकरण नेमके कोणी केले त्या मंत्र्याचा चेहरा उघड होतो आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होईल. जर सदर मंत्र्यावर कारवाई केली नाही तर त्या मंत्र्याविरुद्ध गोव्यात सर्व पक्ष एकत्र येऊन फार मोठे जनआंदोलन करण्याची भीती आहे. त्यातून भाजपची व सरकारचीदेखील बदनामी होऊ शकते. यामुळेच हे प्रकरण कसे हाताळावे हा गंभीर विषय भाजप सरकारसमोर उपस्थित झाला आहे.
नाजूक विषय हाताळताना काळजी हवी
भाजपसाठीच नव्हे तर एकंदर सामाजिक व्यवस्था पाहता हा अत्यंत नाजूक विषय आहे. तो हाताळताना भाजप सरकारसमोर अनेक अडचणी आहेत. सदर मंत्री पीडित महिलेला मदत करून प्रकरण मागे घेण्यास भाग पाडू शकतो. परंतु या संदर्भातील व्हीडिओ आणि दोघांमध्ये झालेले संदेश व त्यांची देवाणघेवाण पाहता हे प्रकरण मिटणे किंवा मिटविणे तेवढे सोपे नाही. काँग्रेसच्या हाती लागलेले घबाड पाहता आता सदर मंत्र्याची सुटका होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हे प्रकरण हाताळताना फार काळजी घ्यावी लागतेय. परंतु सदर मंत्र्याची गच्छंती आता निश्चित आहे. केवळ पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळण्याचीच फुरसत आहे.