वृत्तसंस्था / मुंबई
भारताचा माजी सलामीचा फलंदाज तसेच मुंबईच्या रणजी संघाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व करणारा वासिम जाफरने मुंबईचा सर्वोत्तम संघ निवडला असून सुनील गावसकर आणि रोहित शर्मा ही या संघाची सलामीची जोडी म्हणून त्याने पसंती दिली आहे.
गेल्या मार्चमध्ये निवृत्त झालेला वासिम जाफर सध्या सोशल मिडियामध्ये कार्यरत आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे तो आता आपल्या घरी सुखरूप आहे. ट्विटरद्वारे तो आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्याने स्वत:च्या पसंतीचा सर्वोत्तम मुंबई संघ निवडला असून 1970 नंतरच्या खेळाडूंचा त्यात समावेश आहे. या संघामध्ये सुनील गावसकर आणि रोहित शर्मा यांना सलामीची जोडी म्हणून पसंती दिली आहे. या संघाच्या नेतृत्वासाठी त्याने सुनील गावसकरची निवड केली असून या संघात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, साईराज बहुतुले, रमेश पोवार, अजित आगरकर, अब्दुल इस्माईल, झहीर खान, ऍबे कुरूविला, पद्माकर शिवलकर आणि बारावा खेळाडू म्हणून पारकरचा समावेश केला आहे.
वासिम जाफरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 31 कसोटी आणि दोन वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. वासिम जाफरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला मुंबई संघातून प्रारंभ केला असून सर्वाधिक 150 रणजी सामने खेळण्याचा विकम त्याने मागील वर्षी केला. 2018-19 च्या क्रिकेट हंगामात त्याने 1037 धावा जमविल्या असून त्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याने 260 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 2015-16 क्रिकेट हंगामात त्याने विदर्भ संघात प्रवेश पेला. रणजी स्पर्धेत त्याने 206 ही सर्वोच्च धावा संख्या नोंदविली आहे.