दोन गटांत हाणामारी : दोघे जखमी, 47 जणांविरुद्ध गुन्हा : 9 जणांना अटक : मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
प्रतिनिधी / वास्को
वास्कोत रंगपंचमीच्या धुंदीत नाचणाऱया युवकांच्या गटांत झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे वास्को बोगदा भागात होळी उत्साहाला गालबोट लागले. यामध्ये राजकीय वैमनस्याचेही प्रदर्शन झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण झाली. यात नगरसेवक प्रजय मयेकर यांच्या वडिलांना बरीच मारहाण झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागले तर दुसऱया गटाच्या युवकावर दगड बसून डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यामुळे बोगदा भागात काही वेळ वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी 4 वा.च्या सुमारास घडली होती. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत या वादाची धग पसरली होती. बोगदा भागात रंगपंचमीच्या धुंदीत काही युवक तेथील रस्त्यावरच नाचत होते. त्याचवेळी वाट काढीत आपल्या घरी जात असलेल्या प्रदीप मयेकर यांच्या दुचाकीचा स्पर्श त्या युवकांपैकी एकाला झाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. मयेकर यांना मारहाण झाली. त्यामुळे मयेकर यांची पत्नी, भाऊ, मुलगा बचावासाठी आले असता दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यात मयेकर व दुसऱया गटातील भगत या युवकाच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला. या भांडणात मयेकर यांच्या खिडकीची तावदानेही फोडण्यात आली. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या भांडणामुळे वातावरण बरेच तापले.
जखमी झालेले मयेकर हे मुरगावचे नगरसेवक प्रजय मयेकर यांचे वडील असून हे कुटुंब भाजपा समर्थक आहेत. तर दुसऱया गटातील बरेच कार्यकर्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे या वादाचे रूपांतर राजकीय वैमनस्यात झाले. भाजपाचे युवा अध्यक्ष योगेश बांदेकर व अन्य काही कार्यकर्त्यांनाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हल्ली मारहाण झाल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. नगरसेवक प्रजय मयेकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून असे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करून सरकारने कडक कारवाई करून हे प्रकार रोखावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, हेडलॅण्ड सडा व बोगदा भागात सध्या निवडणुकीतील जय पराजयाचे पडसाद उमटत असून त्यातूनच वादाचे खटके उडत आहेत. होळीच्या निमित्ताने या वाद उफाळून आला आहे. विजयाच्या उन्मादातून काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पराभव सहन झालेला नसल्याने ते वैफल्यग्रस्तेतून काँग्रेस कार्यकर्त्यांशी नाहक वाद घालत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. रंगपंचमीच्यानिमित्ताने उफाळून आलेले राजकीय वैमनस्य हिंसक पातळीवर आलेले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मुरगाव पोलिसांनी या प्रकरणी 47 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केलेला असून 9 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना शरण येण्याचे आवाहन पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी केले आहे.
कुणाचीही गय करणार नाही ः पोलीस महासंचालक
शनिवारी या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालकांनी बोगदा भागाला भेट दिली. कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचाही वापर करू, असे त्यांनी म्हटले आहे. मुरगाव मतदारसंघासह संपूर्ण मुरगाव तालुक्यात कोणतेही अवैध धंदे चालवू देणार नसल्याचे स्पष्ट केले. असे प्रकार कुठेही आढळून आल्यास संबंधित पोलीस स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
हिंसक प्रवृत्तीला थारा नाही
दरम्यान, बोगदय़ावरील या घटनेची दखल काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड, आमदार दाजी साळकर, माजी आमदार मिलिंद नाईक यांनी घेतलेली असून त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी व शनिवारी जखमी मयेकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. मुख्यमंत्री दुपारी वास्कोत आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण, त्यांच्या घरावरील हल्ला ही काँग्रसची प्रवृत्ती दर्शवत असून गोव्यात ही संस्कृती कधीच नव्हती. अशा हिंसक प्रवृत्तीला आपण थारा देणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. तपास सुरू झालेला असून दोषींवर योग्यती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.