विख्यात भारतीय वास्तूविशारद बालकृष्ण दोशी यांना जाहीर झालेला वास्तूकलेतील जागतिक प्रतिष्ठेचा 2022 चा ‘रॉयल गोल्ड मेडल पुरस्कार’ म्हणजे भारतीय वास्तूकलेचाच गौरव मानावा लागेल. रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश ऑर्किटेक्ट्सच्या माध्यमातून वास्तूकलेत अमूल्य योगदान देणाऱया व्यक्ती वा संस्थेस दिला जाणारा हा या क्षेत्रातील मानाचा पुरस्कार होय. किंबहुना, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याकडून या सन्मानाकरिता 94 वर्षीय दोशी यांची निवड होणे, हे अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण तितकेच अभिमानास्पद म्हटले पाहिजे. दोशी यांची सात दशकांची कारकीर्द म्हणजे अनेक कल्पक, दूरदृष्टीपूर्ण व दर्जात्मक वास्तूरचनांचा ठेवा ठरावी. 100 हून अधिक प्रकल्प साकारलेल्या दोशी यांच्या वास्तूरचनांवर पारंपरिक भारतीय वास्तूकलेसोबतच हवामान व स्थानिक संस्कृतीचाही प्रभाव जाणवतो, हे त्यांच्या कलेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्टय़. 1927 मध्ये पुण्यात जन्मलेल्या दोशी यांना कुटुंबातील फर्निचरच्या पिढीजात व्यवसायातूनही एक नजर मिळाली. वडिलांच्या सुतारकामाच्या कार्यशाळेतच लाकडाला आकार देण्याचे वा नक्षीकामाचे धडे त्यांना मिळाले. त्यानंतर चित्रकलेशीही जोडल्या गेलेल्या दोशी यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून शिक्षण घेतले. तेथून त्यांच्यातील वास्तूकलेविषयीची जिज्ञासा वाढतच गेली. पॅरिसमधील प्रसिद्ध वास्तूविशारद ली कार्बूजियर हे वास्तूकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत 1951 ते 54 अशी जवळपास चार वर्षे दोशी यांनी काम केले. 1953 मध्ये याच पुरस्काराने कूर्बजियर यांना गौरविण्यात आले होते. आज जवळपास साडेसहा ते सात दशकांच्या अंतराने त्यांच्याच शिष्याचाही स्थापत्यकलेतील ज्ञानपीठाने सन्मान होणे, हा अनोखा योग मानायला हवा. दोशी यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तूरचनांतून वास्तूविशारदांच्या अनेक पिढय़ांना प्रभावित केले. त्यांना नवी दृष्टी दिली. हे त्यांचे या क्षेत्रातील प्रमुख योगदान. परंपरा आणि आधुनिकता यांचा मनोज्ञ संगम असलेल्या दोशी यांच्या वास्तूरचनांची जगाला भुरळ घातली नसेल, तर नवल. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शतकाहून अधिक वास्तूरचना साकारल्या आहेत. सर्जनशीलता, वैविध व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. प्रशासकीय, सांस्कृतिक इमारती असोत किंवा निवासी इमारती. या साऱयामध्ये दोशींचा आंतरिक टच भासतो. शहर नियोजन व सामाजिक गृहनिर्माणप्रकल्पांतून दोशी यांची दूरदृष्टी उठून दिसते. आपल्या कामातून व शिकवणुकीतून त्यांनी भारतीय वास्तूकलेला नवीन दिशा दिली आहे, असे आरआयबीएचे अध्यक्ष सायमन ऑलफोर्ड म्हणतात. यातच सारे आले. आयआयएम, बेंगळूर, अहमदाबादमधील इन्स्टिटय़ूट ऑफ इंडोलॉजीची इमारत असेल श्रेयस प्रशाला असेल. या साऱया वास्तूंना एक वेगळी शैली आहे. अर्थात या शैलीचे किमयागार दोशी हेच आहेत, हे वेगळे सांगायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. दोशी यांचे या क्षेत्रातील काम संस्मरणीय आहे. सर्जनशीलता आणि वैविध्यपूर्णतेमुळे त्यांचे काम जागतिक स्तरावर प्रशंसनीय ठरल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी काढले आहेत. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दोशी यांनीही आपल्या गुरूंच्या आठवणींना दिलेला उजाळा त्यांच्यातील कलाकाराबरोबर संवेदनशील माणसाचेही दर्शन घडवितो. वास्तूकला जग बदलू शकते, असा विश्वास बाळगणाऱया या वास्तूपुरुषाने आजवर अनेक प्रयोग केले. अर्थात हे प्रयोग करताना त्यांनी त्याला निसर्गपूरकतेची जोड दिली. माळी कसे काम करतो पहा. तो आधी मशागत करतो, मग बियाणे आणि खते घालतो, पिकांची वा झाडांची सर्वतोपरी काळजी वाहतो. मग त्यांना फळे येतात. वास्तूविशारद असाच असावा. बागकाम करणारा. आपण कर्त्याच्या भूमिकेत रहावे. निर्मात्याच्या नव्हे, अशी भूमिका ते मांडतात. यातून त्यांची प्रांजळ वृत्तीच अधोरेखित होते. दोशी यांना आजवर पद्मश्री, पद्मभूषणसह विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील प्रित्झकर या सर्वौच्च पुरस्काराइतकाच सांप्रत पुरस्कारही महत्त्वाचा असाच. बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे काळानुसार बदल हे करावेच लागतात नि प्रत्येक क्षेत्रात हे तत्त्व लागू होते. वास्तूकलाही त्याला अपवाद नाही. तथापि, हे बदल करीत असताना विविध पैलूही ध्यानात घ्यावे लागतात. प्रत्येक भागातील हवामान हे भिन्न असते. तेथील संस्कृती, लोकजीवन यात फरक असतो. या साऱयाला पूरक अशीच घरांची रचना त्या-त्या भागात असते. आधुनिकतेचा स्वीकार करताना हा पारंपरिक घटक लक्षात घ्यावा लागतो. अन्यथा, वास्तूरचनेत त्रुटी राहू शकतात. हा व्यापक अभ्यास व दृष्टीकोन दोशी यांच्या ठायी होता. त्यामुळेच त्यांच्या रचना खऱया अर्थात वस्तुस्थितीदर्शक ठरल्या, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. याशिवाय दोशी यांनी भारतासह जगभरातील विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक या नात्याने वास्तूकला वा आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना या विषयाची खोली व उंची किती आणि कशी आहे, हे वेळोवेळी दाखवून दिले. वास्तू वा स्थापत्यकला म्हणजे काही केवळ इमारती डिझाईन करणे वा बांधणे नव्हे. तर हा एकूणच खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्याला अनेक अंगे, उपांगे आहेत, याची जाणीव व जागृती करण्याचे काम अलीकडच्या काळात इतक्या जोरकसपणे कुणी केले असेल, तर ते दोशी यांनीच. पुढचा काळ हा एकूणच जगासाठी आव्हानात्मक असेल. वाढत्या नागरीकरणामुळे प्रत्येक शहरांपुढे, नगरांपुढे विविध प्रश्न उभे ठाकले आहेत. येणाऱया टप्प्यात या समस्या अधिक बिकट होतील. पायाभूत सुविधा, जागा, रचनापद्धतीचे महत्त्व आणखी वाढेल. या स्थित्यंतरात दोशी यांनी दिलेली दृष्टी आपल्याला पुढची दिशा दाखविण्यास उपयुक्त ठरेल.
Previous Articleसातारा पंचायत समितीच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव
Next Article कर्नाटकात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.