प्रतिनिधी / फोंडा :
ग्रामस्थांनी केलेले आंदोलन व त्यानंतर झालेल्या वाटाघाटीअंती मडकई येथील एनक्यूब औषधोत्पादक कंपनी अजित नाईक या स्थानिक कंत्राटदाराची कामगार बस वाहतूक सेवा कायम करण्यास राजी झाली आहे. सदर कंत्राटदाराकडून गेली 22 वर्षे या कंपनीत कामगार बस वाहतूक सेवा सुरु आहे. गेल्या आठवडय़ात कंपनी व्यवस्थापनाने कुठलेही ठोस कारण न देता त्याचे कंत्राट तडकाफडकी रद्द करण्याचा आदेश काढला होता. त्याविरोधात मडकई नागरिक कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली साधारण शंभरहून अधिक नागरिकांनी शुक्रवारी कंपनीवर मोर्चा नेला होता.
कंपनी व्यवस्थापनाची ही कृती म्हणजे एका स्थानिकावर अन्याय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. स्थानिक कंत्राटदाराची कामगार वाहतूक सेवा बंद करुन ती परप्रांतियांना देण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा डाव असल्याचा आरोप नागरिक कृती समितीने केला होता. मडकई नागरिक कृती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद गावडे, कायदेशीर सल्लागार व युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, स्थानिक सरपंच, पंचसदस्य व ग्रामस्थांचा या मोर्चात सहभाग होता. शुक्रवारच्या मोर्चानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने चार दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार काल गुरुवारी दुपारी कृती समितीचे शिष्टमंडळ व कंपनी व्यवस्थापनाची संयुक्त चर्चा झाली. शिष्टमंडळात ऍड. वरद म्हार्दोळकर, प्रेमानंद गावडे, सिबेन मेहता, प्रशांत च्यारी व सोनार्थ नाईक यांचा समावे होता. कंपनीचे सरव्यवस्थापक सुशिलकुमार देसाई, एच.आर. व्यवस्थापक आरती मुंडये, सुभाष झा यांच्याशी झालेल्या तासभराच्या चर्चेअंती कंपनीने येत्या 1 मार्चपासून अजित नाईक यांची कामगार बस वाहतूक पूर्ववत सुरु करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी दिली. तत्पूर्वी वाहतुकीसंबंधी कंपनीशी लेखी करार होणार आहे, असे त्यांनी सांगितले.