वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भविष्यात टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास वाहनचालकांना टोल भरावा लागणार नाही. रस्तेवाहतूक मंत्रालय वाहनचालकांना टोलनाक्यांवर वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागू नये, अशा दृष्टीने योजना तयार करत आहे. फास्टॅग अनिवार्य होऊनही टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ वाया जात आहे. ही बाब विचारात घेत रस्तेवाहतूक मंत्रालय नवी व्यवस्था लागू करण्याची तयारी करत आहे.
फास्टॅग अनिवार्य झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोलनाक्यांचे निरीक्षण केले जात आहे. फास्टॅगचा वापर वाढूनही टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. टोलनाक्यावर ताटकळत रहावे लागत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
..तर भरावा लागणार नाही टोल
अधिकाऱयानुसार प्रत्येक टोलनाक्यावर एका मर्यादित अंतरावर वेगळी मार्गिका निर्माण करण्याची तयारी केली जात आहे. वाहनांची रांग या मार्गिकेपर्यंत आल्यावर टोलनाका संचालकाला सर्व मार्ग खुले करणे अनिवार्य ठरणार आहे. यादरम्यान टोलनाक्यावर असलेल्या सर्व वाहनांना टोल भरावा लागणार नाही. सर्व वाहने तेथून बाहेर पडल्यावरच मागून येणाऱया वाहनांसाठी टोल आकारता येणार आहे.