प्रतिनिधी / सातारा
वाहनधारकांना वेठीस धरून त्यांच्याकडून अमाप दंड वसूल करत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या या वागणुकीचा वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. या पोलीसांची वसुली थांबवावी अन्यथा अजिंक्य स्वयंचलित रिक्षा-टॅक्सी संघ सातारा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. यावेळी अध्यक्ष विष्णू रामचंद्र जांभळे, गोविंद बारटक्के, महेंद्र गायकवाड, महेश जांभळे, नितिन पवार, श्रीरंग पवार, जयवंत गोसावी, बबुवाहन माळी, चंद्रकांत कुलकर्णी, रमेश भोसले, तुकाराम पाटील, महेश चव्हाण, राजु मोरे, बाळासाहेब चांगण आदी रिक्षा चालक उपस्थित होते.
यावेळी निवेदनात म्हटले की, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यक्षेत्र परिसर किती आहे ? वाहतूक शाखेचे पोलीस हे गजवडी फाटा, नुने, लिंब फाटा, चिंचनेर, संगमनगर, पाटखळ माथा इत्यादी ठिकाणी उभे राहून वाहनधारकांना वेठीस धरून मनमानी दंड ठोठावतात. आणि परजिह्यातील वाहन असेल तर त्याला अवास्तव दंड आकारला जातो. जर एखादी रिक्षा प्रवासी घेऊन स्टँडला सोडत असेल तर वाहतूक पोलीस त्या रिक्षाचा मागून फोटो काढून त्या रिक्षाचालकास दंड भरण्यास पात्र करतात. सातारा शहरात तर हे पोलीस ठिक ठिकाणी वाहतूकीचे कर्तव्य न बजावता पावत्या फाडण्याचे काम करत असतात. ती ठिकाणे चांदनी चौक, गोल बाग, मोती चौक, कमानी हौद, शिवाजी सर्कल, जिल्हा परिषद चौक, राधिका रोड, इत्यादी ठिकाणी उभे राहून वाहनधारकांना पावत्या देण्याचे काम करत असतात. तरी संबंधित अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा ही विनंती संघटनेच्या वतीने करत आहोत.