शहरातील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहतूक पोलिसांनी सध्या योग्य तऱहेने पार्किंग न केलेली वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरात सर्वत्र वाहतूक पोलीस विभागातर्फे वाहने उचलून थेट वाहतूक पोलीस स्थानकाच्या आवारात नेऊन ठेवली जात आहेत. परिणामी वाहनधारकांना निष्कारण मनस्ताप होत आहे.
शहरातील वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असले तरी त्याबाबत पुरेशी जागृती करून लोकांना सूचना देणेसुद्धा आवश्यक होते. बेळगावमध्ये सध्या स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था सर्वांनाच माहीत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी योग्य अशी जागा सध्या तरी उपलब्ध नाही. एका बाजूला रस्त्याचे काम सुरू असल्याने दुसऱया बाजूला रस्त्यावरून सर्व वाहने ये-जा करत असतात. त्यातच विविध कामांसाठी दुकाने, कार्यालये, दवाखाने या ठिकाणी जाणारी मंडळी आपली वाहने रस्त्याशेजारी पार्क करतात. कारण वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागाच सध्या शहरात दिसत नाही. जे काही दोन चार वाहनतळ आहेत ते सतत वाहनांनी भरलेले असतात.
वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग असे फलक लावलेले असले तरी इतक्या लहान अक्षरात आहेत की लोकांना दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलीस संबंधित दुचाकी, चार चाकी उचलून सरळ पोलीस स्थानकामध्ये नेऊन ठेवत आहेत. कोणी पोलिसांवर दबाव आणला तरच वाहन लगेच परत दिले जाते. अन्यथा, वाहन परत आणेपर्यंत वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडू नयेत हे नक्कीच रास्त आहे. पण त्यांनी आपली वाहने कशी आणि कुठे पार्क करावीत याबद्दल जनजागृती करणेसुद्धा आवश्यक आहे. मुळात वर्दळीच्या ठिकाणी किंवा वाहतुकीचे आणि पार्किंगचे नियम सांगण्यासाठी वाहतूक पोलीस खात्याने त्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे. सरसकट वाहने उचलणे आणि पोलीस स्थानकात नेऊन ठेवणे हा नागरिकांवर अन्याय आहे.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे बरेचजण रुग्णांना घेऊन दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जातात. मात्र ते रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून बाहेर येईपर्यंत त्यांचे वाहन पोलिसांनी उचलून नेलेले असते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. आरपीडी क्रॉस, देशमुख रोड, शहरातील खडेबाजार आदी परिसरात हे प्रकार सातत्याने घडत आहे. वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक आहे, हे नागरिकांनाही पटते. प्रथम त्याबाबत जनजागृती करावी, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क केले असल्यास प्रथम दंड आकारावा आणि पुन्हा नियमाचा भंग झाल्यास वाहन उचलून घेऊन जावे, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे हल्ली बरेच तरुण एका दुचाकीवर तिघे तिघे बसलेले आढळतात. काही तरुणांकडून मोठा आवाज करत वाहने चालविली जातात. या तरुणांवर प्रथम कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.
शहरातील काही भंगीबोळांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काही भंगीबोळांमध्ये पेव्हर्स घालण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी आपले वाहने पार्क करावीत, असे सुचविण्यात आले होते. पण भलत्याच लोकांनी हे भंगीबोळ अडवून ठेवले असून खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे त्य्<ााचा वापर सुरू आहे. याकडे प्रशासनाचे आणि पोलीस खात्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीला शिस्त लावणे ही काळाची गरज आहे. मात्र तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पार्किंगसाठी नसलेली पुरेशी जागा, वाहनतळांची वानवा या सर्वांचा वाहतूक पोलीस विभागाने विचार करावा आणि मगच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.