बेळगाव / प्रतिनिधी
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा आदेश दिला. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व संपर्क रस्त्यांवर जागोजागी झाडे कोसळून रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत. वाहतूक रोखण्यासाठी रस्त्याशेजारील झाडांचा वापर केलेला दिसून येत आहे. अत्यावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावो-गावी फिरणाऱया राज्य परिवहन मंडळाची बससेवाही ठप्प करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी वाहतूकदेखील बंद असल्याने गावे सामसूम झाली आहेत. जीवनावश्यक गोष्टीमध्ये फक्त किराणा दुकान, दवाखाने, मेडिकल व दूध डेअऱया सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर वाहतूक रोखण्यासाठी संपर्क रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बेळगाव शहराला महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे कामानिमित्त नागरिक दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. हे टाळण्यासाठी सीमारेषेवरील रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. अतिउत्साही तरुणांवर लाठीचार्ज केली जात आहे. दिवसरात्र हे काम सुरू असल्याने अनावश्यक वाहतूकही कमी झाली आहे.