कराडच्या बडवेंची कोल्हापुरला बदली, शाखेत नियोजनाची गरज
प्रतिनिधी/ कराड
शहरात सध्या लॉकडाऊन सुरू असून वर्दळीने गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. याच काळात शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास बडवे यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यामुळे शाखेचा अतिरिक्त कारभार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांच्या खांद्यावर आला आहे. शहराच्या वाहतूक नियोजनासाठी गोडसे काय उपाययोजना राबवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लॉकडाऊन होण्यापुर्वी कराडच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला नेहमीच पहायला मिळाला. पार्कींगचे नियोजन नसल्याने शहरात अस्ताव्यस्त वाहने उभी असतात. तत्कालीन पोलीस उपअधिक्षक मनोज पाटील यांच्या काळात शहरात सम विषम पार्कींगचा नियम सुरू झाला आजही तोच नियम सुरू आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येनुसार नियमात कोणताही बदल केला गेला नाही. आजपर्यंत अनेक आराखडे तयार झाले मात्र ते केवळ कागदोपत्री कार्यवाहीपुरतेच मर्यादीत राहिले. सिग्नल व्यवस्था, अपवादात्मक एकेरी वाहतूक वगळता शहरात नव्याने बदल झालेले नाहीत. अनेक अधिकारी आले आणि बदलून गेले. चार महिन्यापुर्वी कराडच्या वाहतूक शाखेचा पदभार घेतलेले विकास बडवे यांचीही शुक्रवारी बदली झाली. कोल्हापूर येथे त्यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांच्याकडे तात्पुरता कारभार सोपवला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी सक्षम अधिकारी यांच्याकडे वाहतुक शाखेचा कारभार सोपवण्याची गरज आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. पार्कींगचा बोजवारा उडालेला असतो. नव्या अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवला आहे. प्रसंगी गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठीही त्यांनी नगरपरिषद प्रशासनाबरोबर वारंवार बैठका घेतल्या आहेत. नव्याने येणारया अधिकारयाने याची अमलबजावणी करण्याची गरज आहे