नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाहनांचा अपघात झाल्यानंतर विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयुसी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पीयुसी प्रमाणपत्र नसेल तर विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना दिले आहेत. या निर्देशांमुळे आता वाहनधारकांना वेळच्यावेळी पीयुसी चाचणी करून प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सर्व वाहनांना पीयुसी प्रमाणपत्राची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पीयुसी असणे गरजेचे आहे. वाहनांचा विमा काढण्यासाठी यापुढे हे प्रमाणपत्र विमा कंपन्यांनी बंधनकारक करावे असे ‘आयआरडीए’ने विमा कंपन्यांना बजावले आहे.