लॉकडाऊन शिथिलनंतर गर्दीत वाढ, शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोविड – 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील भाजी मंडई बंद केल्या आहेत. दीड महिन्यापासून मंडई बंद असल्यामुळे प्रमुख रस्त्यावर भाजी विक्री सुरु आहे. सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड रहदारी वाढली आहे. भाजी विक्रेते रस्त्यावरच असल्याने आता वाहतूकीची कोंडी होऊ लागली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे दीड महिना सर्व व्यवहार ठप्प होते. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता रस्त्यावर ठराविक वाहने धावत होती.गर्दी होऊ नये म्हणून भाजी मंडई बंद करुन भाजी विक्रेत्यांना अंतर ठेवून रस्त्यावर भाजीविक्रीला परवानगी दिली होती.तरीही गर्दी होऊ लागल्याने प्रभागात फिरुन भाजी विक्रीचे आदेश दिले. रविवार (3 मे) पर्यंत सोशल डिस्टन्स ठेवून भाजी विक्री करण्यात येत होती. पण सोमवारपासून लॉकडाऊनध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. दीड महिना घरात कोंडलेले लोक मोठय़ा संख्येने बाहेर पडले. भाजी मंडई अद्याप सुरु करण्यात आल्या नाहीत.यामुळे मंगळवारी भाजीविक्रेते आणि वाहने एकाचवेळी रस्त्यावर आल्याचे चित्र होते. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गंगावेश, ऋणमुक्तेश्वर या ठिकाणी प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
रस्त्यावरील भाजी विक्री बंद करण्याची गरज
भाजी मंडईत होणारी गर्दी रस्त्यावर होऊ लागली आहे.यामुळे पार्किंग आणि वाहतूकीच्या कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या बाजूला विक्रेत बसत असल्यामुळे एखाद्या मोकाट भरधाव वाहनधारकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रस्त्यावरील भाजी विक्री बंद करण्याची गरज आहे.
मद्य खरेदीसाठी रांगामुळेही वाहतुकीस अडथळा-
सोमवारपासून मद्याची दुकाने सुरु झाली आहेत. मद्यपींनी मद्याच्या दुकानात गर्दी केली आहे.कडाक्याच्या उन्हात रांगा लावून ही खरेदी सुरु आहे.या रांगा मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.