कोरोनाच्या प्रभावातून वाहन क्षेत्र सावरतेय : मारूती, टाटा मोटर्सचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील वाहन क्षेत्र कोरोनाच्या महामारीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असून देशात लसीकरण मोहिमेला गती मिळत असल्याने वाहन विक्रीवर सकारात्मक परिणाम दिसले आहेत. आता वाहन विक्रीत वाढीला सुरूवात झाली आहे. कंपन्यांच्या मार्चमधील वाहन विक्रीतील आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. यामधील काही निवडक कंपन्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
मारुतीने विकल्या 1,67,014 कार्स
देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून मारुती सुझुकी इंडियाला ओळखले जाते. मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 1,67,014 इतक्या कार्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत मारुतीने फक्त 83,792 इतक्या कार्सची विक्री केली आहे.
टाटा मोर्ट्सने विकल्या 29,654 गाडय़ा
मार्च 2021 मध्ये टाटा मोर्ट्सने आपल्या प्रवासी वाहन विभागात मजबूत अशी 422 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीने या दरम्यान 29,654 गाडय़ा विकल्या आहेत. मार्च 2020 मध्ये नाममात्र 5,676 गाडय़ांची विक्री झाली होती. म्हणजे कंपनीने 23,978 इतक्या अधिकच्या गाडय़ांची याखेपेस विक्री केली आहे.
महिंद्राची विक्री 40,403 वर
मागील महिन्यात महिंद्रा ऍण्ड महिंद्रा या कंपनीने एकूण 40,403 गाडय़ांची विक्री केली आहे. या दरम्यान देशातील बाजारात 16,700 प्रवासी वाहने आणि 21,577 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली आहे. कंपनीने मागच्या वर्षी समान कालावधीत 6,679 वाहनांची विक्री झाल्याची नोंद केली आहे.
टोयोटाने विकल्या 15,001 गाडय़ा टोयोटा किर्लोस्कर मोटारची विक्री मागील आठ वर्षात सर्वाधिक राहिल्याचे पहावयास मिळाले. कंपनीने मागच्या महिन्यात 15,001 गाडय़ांची विक्री केली आहे. यासोबतच 2013 नंतर कंपनीने देशात सर्वाधिक विक्री केल्याची नोंद आहे.