वृत्तसंस्था/ अहमदाबाद
इंग्लंडवर टी-20 मालिकेत 3-2 असा विजय मिळविल्यानंतर भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाचे बुधवारी येथे आगमन झाले. या मालिकेत वनडे व टी-20 सामने होणार आहेत.
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विंडीज संघ तीन वनडे सामने भारताविरुद्ध खेळेल. त्याची सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होईल. त्यानंतर ईडन गार्डन्सवरील तीन टी-20 सामन्यांसाठी विंडीज संघ कोलकात्याला प्रयाण करेल. ‘बार्बाडोसहून दोन दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर ‘मेन इन मरून’ भारतात दाखल झाले आहेत,’ अशी पोस्ट क्रिकेट विंडीजने आपल्या ट्विटर हँडलवर बुधवारी सकाळी केली. आम्ही सुरक्षितपणे अहमदाबादला पोहोचलो. येथे 3 वनडे खेळण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत, असे त्यांनी त्यात पुढे म्हटले आहे.
क्रिकेट विंडीजने आपला संघ अहमदाबादमधील विमानतळावर दाखल होत असल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. गुजरात क्रिकेट संघटना या सामन्यांचे आयोजन करीत असून तीनही सामने प्रेक्षकांविना खेळविले जाणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. याउलट पश्चिम बंगाल सरकारने तीन टी-20 सामन्यांसाठी क्षमतेच्या 75 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. कोलकात्यात टी-20 सामने 16, 18, 20 फेब्रुवारी रोजी होतील. त्याआधी 6, 9 व 11 फेब्रुवारी रोजी वनडे सामने अहमदाबादमध्ये खेळविले जातील.