पालकमंत्री उदय सामंत यांना विश्वास
नाहक त्रास नको, विरोधकांनाही दिला इशारा
रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्गातही मी एलईडी मासेमारीविरोधात!
वार्ताहर / कणकवली:
कुणाला नाहक त्रास देणे हा माझा पिंड नाही. मात्र, आम्हाला कुणी नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर माझा गाव सिंधुदुर्गातच आहे. मी असे खपवून घेणार नाही. दादागिरी करून मने जिंकण्यात फायदा नाही. आम्हाला विकास करून सिंधुदुर्गातील जनतेची मने जिंकायची आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या मनातील विकास आम्हाला करायचा आहे. एलईडी मासेमारीविरोधात मी रत्नागिरीतही होतो व सिंधुदुर्गातही विरोधातच आहे. त्यामुळे मी पालकमंत्री झाल्यावर माझ्याबद्दल मच्छीमारांमध्ये गैरसमज पसरविणाऱयांना हे पुरेसे आहे, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
जिल्हय़ाच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच जिल्हय़ात आलेल्या सामंत यांचे कणकवलीत पटवर्धन चौकात ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. पटवर्धन चौकात यानिमित्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. नंतर येथील एचपीसीएल हॉलमध्ये आयोजित तालुका मेळाव्यात सामंत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, निरीक्षक प्रदीप बोरकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेटय़े, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माही परुळेकर, मानसी मुंज, कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना समन्वयक राजू राठोड, शंकर पार्सेकर, संदेश पटेल, गीतेश राऊत, ऍड. हर्षद गावडे, प्रतीक्षा साटम, तेजस राणे, किरण वर्दम आदी उपस्थित होते.
गोव्याला हेवा वाटेल असा जिल्हय़ाचा विकास!
सामंत म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच जिल्हय़ात आल्यावर शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहता मी एकटा पालकमंत्री नाही, तर महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता व जनता पालकमंत्री झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱयावर दिसत आहे. तसेच कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर मी जिल्हय़ातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत उद्याच बैठक घेणार आहे. ज्येष्ठांच्या प्रश्नांना आठ तासात न्याय देण्याची भूमिका मी घेतो. गेली अनेक वर्षे हे प्रश्न का सुटले नाहीत, त्याचे आत्मचिंतन करा. जिल्हय़ाचा विकास करताना गोव्याने म्हटले पाहिजे की सिंधुदुर्गसारखा आमचा विकास व्हायला हवा.
अबकी बार जि. प.मध्ये 35 पार!
सामंत म्हणाले, येत्या काळात जिल्हय़ात संघटनात्मक स्तरावर उद्दिष्ट ठेवून काम करूया. तसे केल्यास 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत जि. प.वर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. जि. प. मध्ये ‘अब की बार 35 पार’ झाले पाहिजे. मी पालकमंत्री झाल्यावर काहींना माझ्यासोबत जुनी मैत्री आठवायला लागली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास करण्याचे ध्येय ठेवत काम करतांना ‘चांदा ते बांदा’ व अन्य योजनांच्या माध्यमातून काम करायचे आहे. एवढय़ा वर्षात इतरांवर विश्वास ठेवलात, तसाच विश्वास माझ्यावर ठेवा. तालुका शिवसेनेतर्फे माझा केलेला सत्कार फुकट जाणार नाही. येत्या काळात त्याचा तुम्हाला पश्चातापही होणार नाही. माझ्यावर टीका करण्यासाठी अन्य काही सापडत नसल्याने माझ्यावर एलईडी मासेमारीबाबत टीका करत मच्छीमारांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. सर्वांनी एकसंघ राहून काम करुया.
काजूला चांगला दर हवा!
सतीश सावंत म्हणाले, जिल्हय़ातील शेतकरी मुंबईला जाता नये, यासाठी काजू, आंबा, कोकम आदी फळ प्रक्रियांना चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काजूला चांगला दर मिळण्यासाठी जीआय मानांकन होण्याची गरज आहे. उस क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून छोटी धरणे व्हावीत. यामुळे रोजगार वाढेल. जिल्हय़ात व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.
…तर कणकवलीतही शिवसेनेचा आमदार!
संदेश पारकर म्हणाले, उदय सामंत यांनी तरुणांचे नेतृत्व करत राजकारणात काम सुरू केले. संघटनेची जबाबदारी पार पाडल्याने त्यांना पालकमंत्री पद मिळाले. त्यांच्या अनुभवाचा जिल्हय़ाला फायदाच होणार असून प्रशासनावरही ते पकड ठेवतील. येत्या काळात कणकवली मतदारसंघातील विरोधी पक्षाचा आमदार जात येथे शिवसेनेचा भगवा फडकेल. ज्या पद्धतीने रत्नागिरी शिवसेनामय केली तसेच जिल्हा शिवसेनामय होईल. आताच्या स्थितीत सिंधुदुर्ग गोव्यावर अवलंबून आहे. रोजगाराची संधी येथे उपलब्ध झाली तर जिल्हय़ाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तालुका शिवसेना व पत्रकार संघातर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजू शेटय़े यांनी केले.
आम्ही सर्व एकसंघच!
माजी पालकमंत्री दीपक केसरकरना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यांनी त्या बातम्यांचे खंडनही केले होते. मात्र, नवीन पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर सामंत यांच्या पहिल्याच जिल्हा दौऱयात केसरकर अनुपस्थित होते. या अनुषंगाने सामंत यांनी आपल्या भाषणातून ‘दीपक केसरकर हे माझ्याशी चर्चा करूनच मुंबईला बैठकीसाठी गेले. आम्ही सर्व एकसंघ आहोत’ असे सांगितले.